वर्धा : 40 झोपड्यांवर चालला सार्वजनिक बांधकाम विभागाचा 'गजराज'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 05:15 PM2018-02-21T17:15:08+5:302018-02-21T17:18:17+5:30

वर्धा : येथील बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या रुंदीकरणाच्या कामात अतिक्रमण करून राहत असलेल्या सुमारे ४० कुटुंबीयांच्या झोपड्या अडथळा निर्माण करीत असल्याचे कारण पुढे करीत बुधवारी सा. बां. विभागाने विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवून काही झोपड्या पाडल्या.

अतिक्रमण धारकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढावे, अशी नोटीस यापूर्वी सा. बां. विभागाच्या वतीने सदर झोपडी मालकांना बजावला होता. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अतिक्रमण हटाव मोहीम राबवित असताना सदर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात सा.बां.वि.च्या अधिका-यांसह कर्मचा-यांनी जेसीबीच्या सहाय्याने दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे २५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या प्रकारामुळे सदर २५ जणांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. आचार्य विनोबा भावे उड्डणपूल परिसरात अतिक्रमण करून राहणा-यांना तात्काळ पक्के घरे बांधून देण्यात यावी, अशी मागणी अतिक्रमण धारकांची आहे.

जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अतिक्रमण हटाव मोहीम थांबविली आहे. येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण न काढल्यास पाच दिवसानंतर सा.बां.विभागाच्या वतीने पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अतिक्रमण मोहिमेदरम्यान आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी व अतिक्रमण धारक यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. चर्चेअंती येत्या पाच दिवसांत अतिक्रमण धारकांनी स्वत:च अतिक्रमण काढावे यावर अतिक्रमण धारकांनी होकार दर्शविल्याने जिल्हाधिका-यांच्या सूचनेवरून बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली.