महाराष्ट्र निवडणूक २०१९ : म्हणून विधानसभा निवडणुकीत झाली महायुतीची पिछेहाट

By बाळकृष्ण परब | Published: October 24, 2019 10:51 PM2019-10-24T22:51:11+5:302019-10-24T22:52:41+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज जाहीर झालेला निकाल अनेकांना धक्का देणारा ठरला.

Maharashtra Election 29: BJP-Shivsena get setback in Maharashtra Assembly Election | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : म्हणून विधानसभा निवडणुकीत झाली महायुतीची पिछेहाट

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : म्हणून विधानसभा निवडणुकीत झाली महायुतीची पिछेहाट

Next

 - बाळकृष्ण परब 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज जाहीर झालेला निकाल अनेकांना धक्का देणारा ठरला. राज्यात आणि केंद्रास सत्तेवर असलेल्या भाजपाच्या महत्वाकांक्षेला या निकालांनी जोरदार धक्का दिला. तर मतदारांनी अनपेक्षित साथ देऊन जागांचे भरभरून दान पदरात टाकल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला या निकालांनी सुखद धक्का दिला आहे. 

आता शिवसेना आणि भाजपा महायुतीचा विचार करावयाचा झाल्यास लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बंपर यशानंतर भाजपाला राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पडू लागले होते. मात्र अखेरच्या क्षणी शिवसेनेशी युती केल्यानंतरही भाजपाचे नेते २२० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा छातीठोकपणे करत होते. पण प्रत्यक्ष निकालांनंतर महायुतीच्या नेत्यांचा हा दावा सपशेल फोल ठरला आहे. गतवेळी स्वतंत्रपणे लढून १८५ जागा जिंकणाऱ्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत २२७ जागांवर मुसंडी मारणाऱ्या महायुतीला आजच्या निकालांत केवळ १६० जागांपर्यंतच मजल मारता आली. समोर विस्कळीत विरोधी पक्ष असताना एकत्र लढूनही भाजपा आणि शिवसेना महायुतीच्या झालेल्या या पिछेहाटीची अनेक कारणे आहेत. 

अतिआत्मविश्वास 
महायुतीच्या पिछेहाटीचे सर्वात मोठे कारण म्हणजे दोन्ही पक्षांचा अतिआत्मविश्वास. गेली पाच वर्षे राज्यात निर्विवाद सत्ता राबवल्याने तसेच लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्याने भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांना विजयाबाबत अतिआत्मविश्वास होता. गलितगात्र झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीला आपण सहजपणे नमवू, आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही, अशी धारणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची झाली होती. त्यांच्या देहबोलीतून ती जाणवत होती. त्यातूनच विरोधी पक्षांना गृहित धरले गेले आणि त्याचा फटका भाजपा आणि सेनेला बसला.  

शिवसेना आणि भाजपातील मतभेद 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपाच्या नात्यात म्हणावा तसा गोडवा राहिला नव्हता. जरी हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत राबत असले तरी त्यांच्यात अंतर्गत मतभेद खूप होते. त्यातून एकमेकांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष ज्या एकदिलाने लढले तसे चित्र विधानसभेत दिसले नाही. परस्परविरोधी बंडाळीला उत आला. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाडापाडी झाली. अखेरीस त्याची परिणती पिछेहाटीमध्ये झाली. 

 पुरस्थिती वेळी दाखवलेली अनास्था
यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात अभूतपूर्व पुरस्थितीने थैमान घातले. त्यात कोल्हापूर, सांगली या भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली. मात्र राज्यात पुराने थैमान घातले असताना भाजपाची महाजनादेश यात्रा सुरू होती. त्यातच सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी पुरग्रस्तांबाबत कमालीची अनास्था दाखवली. त्यामुळे तेव्हापासूनच संतापाचे वातावरण निर्माण झालेले होते. त्याचा फटका या भागात युतीला बसला. 

स्थानिक मुद्द्यांपेक्षा कलम ३७० वर दिलेला भर 
यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपाने स्थानिक मुद्द्यांपेक्षा कलम ३७० हटवण्याच्या निर्णयावर अधिक भर दिला. अगदी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आपल्या प्रत्येक सभेत या मुद्द्याचा वारंवार उल्लेख केला. मात्र राज्यातील स्थानिक मुद्द्यांपेक्षा कलम ३७० ला दिलेले अधिक महत्त्व मतदारांना फारसे रुचले नाही. त्याची परिणती मतदार भाजपापासून दूर जाण्यात झाली. 

मेगाभरतीचे बुमरँग 
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला मोठे यश मिळाल्यानंत दोन्ही पक्षांत प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. त्यातून काँग्रेस राष्ट्रवादीमधील अनेक नेत्यांना प्रवेश दिला गेला. यातील काही नेते विजयी झाले, तर अनेक जणांना पराभव पत्करावा लागला. मात्र भाजपा आणि शिवसेनेने राबवलेल्या सरसकट मेगाभरतीच्या धोरणामुळे मतदारांमध्ये चुकीचा संदेश गेला. तसेच ही मेगाभरती भाजपा आणि शिवसेनेवरच उलटली.   
  
इडीची कारवाई 
विधानसभा निवडणुकीला काही दिवसच उरले असताना राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना ईडीने पाठवलेली नोटीस ही कळीचा मुद्दा ठरली. शरद पवार यांनी या कारवाईचा पुरेपूर राजकीय फायदा उठवत भाजपाविरोधात वातावरण निर्मिती केली. 
  
शरद पवार यांचा झंझावाती प्रचार
या सर्वांबरोबरच शरद पवार यांनी केलेला झांझावाती प्रचार हे या निवडणुकीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.  एकीकडे भाजपा आणि शिवसेना लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही बंपर यश मिळवणार या कल्पनेनेच विरोधी पक्षांचे अवसान गळाले होते. अनेक नेते भाजपा आणि सेनेची वाट धरत होते. मात्र अशा परिस्थितीत शरद पवार यांनी विरोधी पक्षांचा किल्ला जिद्दीने लढवला.  राज्यभर झंझावाती दौरे करत राज्यसरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली. त्यातच सातारा येथील त्यांची सभा ही पश्चिम महाराष्ट्रातील निकालांच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट ठरली. बाकी पवारांचा या निवडणुकीवर पडलेला प्रभाव निकालांमधून स्पष्टच दिसत आहे. 
 

Web Title: Maharashtra Election 29: BJP-Shivsena get setback in Maharashtra Assembly Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.