'भ'काराचा भडिमार... महाराष्ट्राच्या राजकारणात असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस!

By यदू जोशी | Published: April 26, 2024 07:43 AM2024-04-26T07:43:26+5:302024-04-26T07:43:50+5:30

यावेळच्या प्रचारात सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी पातळी सोडली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राने असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस गाठला आहे!

Special Article - Level of Maharashtra politics has fallen | 'भ'काराचा भडिमार... महाराष्ट्राच्या राजकारणात असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस!

'भ'काराचा भडिमार... महाराष्ट्राच्या राजकारणात असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस!

महाराष्ट्रातील काही नेत्यांनी सध्या तारतम्य सोडले आहे, त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होत आहे. परवा भाजपचे नेते विनोद तावडे मुंबईत पत्रकारांना सांगत होते, ‘मी बिहारमध्ये जातो, तर लोक विचारतात की, तुमच्या महाराष्ट्रात हे काय चालले आहे, किती शिवराळपणा आलाय प्रचारात !’ वाईट काही असले की आपण बिहारचे उदाहरण देतो. आता बिहारवालेच आपल्या खालावलेल्या प्रचाराची चिंता करत आहेत. म्हणजे आपण कोणत्या थराला पोहोचलो ते बघा. चोर, चोट्टे, डाकू, ...खाऊ, पागल, चिल्लर, हरामी, कुत्रा, नाचे, लफडेबाज असे शब्द सर्रास प्रचारात वापरले जात आहेत. भकारांत शब्दांचा भडिमार सुरू आहे. कमरेखालचे शब्द परवलीचे बनले आहेत. बदला घेण्याची भाषा दोन्ही बाजूंनी वापरली जात आहे.

सुसंस्कृत महाराष्ट्राने असंस्कृतपणाचा किळसवाणा कळस गाठला आहे. लोकांचाही दोष आहेच ! नेत्यांनी मुद्देसूद मांडणी केलेली त्यांना नको आहे. आईबहिणींवरील शिव्या कोण्या नेत्याने दिल्या की लोक त्याला टाळ्या, शिट्ट्यांनी दाद देतात. परवा एक बऱ्यापैकी सुसंस्कृत नेते खासगीत म्हणत होते की, ‘अहो, असे शाऊटिंग ब्रिगेडवाले एकदोन लोक सगळ्यांनाच हवे असतात. आम्हाला जे बोलता येत नाही ते आम्ही त्यांच्याकडून वदवून घेतो!’- याचा अर्थच हा आहे की, बिघडलेले नेते बिघडलेलेच आहेत; पण सुधारलेलेही बिघडलेल्यांविषयी आस्था बाळगून आहेत. काही शिव्या तर इतक्या घाणेरड्या आहेत की, त्या चांगल्या माणसांना  फुल्या, फुल्या करूनच छापाव्या किंवा सांगाव्या लागतात.  एकंदरीत काय तर फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा फुल्याफुल्यांचे राजकारण सुरू आहे. एखाद्याने खालच्या पातळीची भाषा वापरली, की दुसरा त्याहून खालची भाषा वापरतो, अशी उलट्या पायांची शर्यत महाराष्ट्रात सुरू आहे. 

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय पक्षांनी ग्रेट रोमन सर्कशीला लाजवणाऱ्या ज्या कोलांटउड्या घेतल्या, त्या लोकांना रुचलेल्या नाहीत. या कोलांटउड्यांच्या दरम्यान त्या-त्या पक्षाचे लाउडस्पीकर बनून जे नेते फिरत होते ते आणि त्यांच्या नादाला लागून चांगले नेतेही शिवीगाळीवर उतरले आहेत. एकमेकांना पाहून घेण्याची, जेलमध्ये टाकण्याची, धमक्यांची भाषा वापरली जात आहे. महाराष्ट्राच्या जनतेची खरेच माफी मागायची असेल तर वापरलेल्या अश्लाघ्य भाषेबद्दल मागा आणि पुन्हा तसे घाणेरडे बोलणार नाही, असा शब्द द्या !! 

भाजप : बाहेरचे, मूळचे 

बाहेरून भाजपमध्ये आलेले उमेदवार स्वत:ची समांतर प्रचार यंत्रणा राबवतात, भाजपच्या केडरला फारसे महत्त्व देत नाहीत असा अनुभव चार-पाच मतदारसंघांमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना येत आहे. एका उमेदवाराच्या मतदारसंघात पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या तयारीसाठी स्थानिक नेत्यांची बैठक झाली. पत्नीला रिंगणात उतरविलेल्या पतीने बैठकीत  म्हटले की, या सभेसाठी कोणता नेता किती गाड्यांची व्यवस्था करतो हे तपासण्यासाठी मी एजन्सी नेमली आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या बैठकीतील भाजपच्या नेत्यांना या विधानाने धक्काच बसला. एकाने उमेदवार पतीला तिथेच खूप काही सुनावले. उमेदवाराची समांतर यंत्रणा भाजपच्या मूळ यंत्रणेला मोजत नाही अशा तक्रारी पाच-सहा मतदारसंघांमध्ये आहेत.

तावडे अन् लग्न तारीख 

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे बिहारचे पक्षप्रभारी आहेत. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट. बिहारमध्ये निवडणुकीच्या तारखांना लग्नाची दाट तिथी येतेय. त्यामुळे मतदानाचा टक्का घटेल हे ओळखून तावडेंनी भाजपचे अनेक नेते-कार्यकर्ते वेगवेगळ्या लग्नघरी पाठविले आणि विनंती करून  लग्नाची तारीख अनेकांना बदलायला लावली. लोकांनीही या विनंतीला मोठा प्रतिसाद दिला. पर्यायी तारखेला मंगल कार्यालय मिळेल याची व्यवस्थाही कार्यकर्त्यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून लढत आहेत, त्यांनी सगळ्या टूर ऑपरेटर्सना बोलविले, लक्षात आले की जवळपास तीसएक हजार मतदार सहल म्हणून मतदानाच्या दिवशी बाहेर जाणार आहेत. शाह यांनी ‘विनंती’ करून सगळे बुकिंग रद्द करण्यास लावले. महाराष्ट्रात पक्षाची यंत्रणा इतकी सतर्क नाही दिसत.

प्रिय निवडणूक आयोग,

या काही ओळी तुझ्यासाठी. ४५ च्या तापमानात मतदारराजा मतदानाला जातोय. पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी विदर्भात मतदारांची जी आबाळ झाली ती कृपया होऊ देऊ नकाेस. तास तासभर लोक उन्हात रांगेमध्ये उभे होते, वर मंडप नाही, अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीही नाही अशी स्थिती होती. मध्ये कुठे तरी वाचले होते की, कुणा मतदाराला उन्हाचा त्रास झाला तर ओआरएस पावडरच्या पाऊचची व्यवस्था होणार आहे, पण तेही कुठे दिसले नाही. मतदार याद्यांमधून किती किती नावे गायब होती म्हणून सांगू. लोकांचे खूप हाल झाले, यादीत नाव नाही हे पाहून मनस्ताप झाला तो वेगळाच. घरातल्या दोन मेलेल्या माणसांची नावे यादीत आहेत आणि आपले नाही, हे बघून लोकांची काय अवस्था झाली असेल? तूही हतबल आहेस म्हणा, तुझ्याकडे स्वत:ची यंत्रणा नाही, इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांवर तुझे काम चालते. मतांचा टक्का वाढवा असे आवाहन तू करतोस, पण ते खरेच वाढले पाहिजे यासाठीच्या व्यवस्थेचा पूर्ण अभाव दिसला रे बाबा! आणखी चार टप्पे बाकी आहेत, तेव्हा मतदारराजाच्या त्रासाचे टप्पे कमी कर, टप्प्याटप्प्याने त्रास नकोस देऊ रे आयोगा !

Web Title: Special Article - Level of Maharashtra politics has fallen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.