हातकणंगले लोकसभा मतदारसंघात साखर पेरणी की जातीचा मुद्दा?

By राजाराम लोंढे | Published: May 2, 2024 04:57 PM2024-05-02T16:57:28+5:302024-05-02T16:59:33+5:30

वातावरण टाइट : ‘शेट्टी-सरुडकर-मानें’मध्येच फाइट

Will sugar sowing or caste issue be important in Hatkanangle Lok Sabha Constituency? | हातकणंगले लोकसभा मतदारसंघात साखर पेरणी की जातीचा मुद्दा?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात साखर पेरणी की जातीचा मुद्दा?

राजाराम लोंढे

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या एंट्रीने ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे गणित काहीसे विस्कळीत केले. बहुरंगी लढत होत असली तरी आघाडीचे पाटील-सरुडकर, ‘स्वाभिमानी’चे शेट्टी व महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांच्यातच फाइट होणार आहे. गेल्या निवडणुकीत ‘वंचित’ने शेट्टींचे विजयाचे गणित बिघडविले; परंतु या निवडणुकीत तो फॅक्टर नाही. मात्र, जातीचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

कोल्हापूरप्रमाणेच या मतदारसंघातही खासदार माने यांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत झगडावे लागले. भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला होता. त्यात भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा करून वादळ उठवून दिले. त्यामुळे माने उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्यांच्या उमेदवारीबद्दल साशंकता व्यक्त झाली.

दुसऱ्या बाजूला शेट्टी व महाविकास आघाडी यांच्यातील घोळही तसाच सुरू राहिला. सुरुवातीला सोबत या म्हणणाऱ्या शेट्टी यांना नंतर उद्धवसेनेने मशाल हातात घेण्याची अट घातली. ती त्यांनी मान्य न केल्याने उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार सत्यजित सरुडकर यांना रिंगणात उतरवून लढतीचे चित्रच बदलून टाकले आहे.

निवडणुकीत गाजत असलेले मुद्दे :

  • खासदार माने यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवली आणि उद्धवसेनेची संगत सोडून शिंदेसेनेत प्रवेश केल्याचा मुद्दा प्रचारात जोरात आहे.
  • या मतदारसंघात प्रथमच शाहूवाडी भागाला उमेदवारी मिळाल्याचा भावनिक मुद्दाही चर्चेत
  • ‘स्वबळ’ शेट्टींची नाव पैलतीरी नेणार का याची उत्सुकता
  • मतदारसंघातील हवा पाहता वंचितचा फॅक्टर यावेळी निष्फळ


निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  • गतनिवडणुकीत माने यांचा विजय इचलकरंजी शहरानेच निश्चित केला; परंतु गेल्या पाच वर्षांत पाणीप्रश्न जैसे थे आहे.
  • इचलकरंजीच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत घोषणांचा पाऊस परंतु प्रत्यक्षात काहीच पदरात नाही.
  • पंचगंगा प्रदूषणाचे चटके या मतदारसंघाला जास्त बसतात; परंतु त्याबाबतीतही पाच वर्षांत काही झाले नाही.
  • शाहूवाडी, पन्हाळा भागात औद्योगिक प्रकल्प नाही. तरुणांच्या हाताला रोजगार नाही.


वाळवा-शिराळ्यावर सरुडकरांची भिस्त

उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी हवा तयार केली आहे. त्यांचे ‘शाहूवाडी’ होमपिच असून, विश्वासराव नाईक साखर कारखान्यामुळे शिराळ्यात राबता आहे. आमदार जयंत पाटील यांची वाळव्यात ताकद असल्याने या मतदारसंघावरच सरुडकरांची भिस्त आहे.

कारखानदारांची ‘साखर’ पेरणी निर्णायक

हातकणंगले’त दहा साखर कारखाने असून, ही ताकद सरुडकर व धैर्यशील माने यांच्यात विभागणार आहे. शेवटच्या क्षणी अंदाज घेऊन कारखानदार करणारी ‘साखर’ पेरणीच निर्णायक ठरू शकते.

मानेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या जोडण्या

उमेदवारीबाबत झालेल्या गोंधळामुळे मानेंना स्पर्धेत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगलेत तळ ठोकून नाराजांची नाराजी दूर करत गेल्यावेळच्या विजयातील घटकांना सोबत घेण्याची खेळी खेळली आहे.

‘स्वबळ’ शेट्टींची नाव पैलतीरी नेणार का?

राजू शेट्टी हे २००९ ला ‘रिडालोस’कडून, २०१४ महायुती, तर २०१९ महाविकास आघाडीसोबत लढले. पहिल्यादांच ते स्वबळावर लढत आहेत. साखर कारखानदारांना अंगावर घेऊन शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस दर दिल्याचा मुद्दा ते मांडत आहेत.

एकूण मतदार

  • १८,०१,२०३
  • पुरुष : ९,१९,६४६
  • महिला : ८,८१,४६६


२०१९ ला काय घडले...?

  • धैर्यशील माने शिवसेना (विजयी) - ५,८५,७७६
  • राजू शेट्टी स्वाभिमानी पक्ष - ४,८९,७३७
  • असलम सय्यद वंचित बहुजन आघाडी - १,२३,७७६
  • नोटा  -  ७१०८


२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?

२०१४ राजू शेट्टी (स्वाभिमानी) ६,४०,४२८ : ५३.८० टक्के
२००९ राजू शेट्टी (स्वाभिमानी) ४,८१,०२५ : ४९.१७ टक्के
२००४ निवेदिता माने (राष्ट्रवादी) ४,२२,२७२ : ५३.३७ टक्के
१९९९ निवेदिता माने (राष्ट्रवादी) ३,३७,६५७ : ४१.६३ टक्के
१९९८ कल्लाप्पा आवाडे (काँग्रेस) ३,४४,८१७ : ४७.०७ टक्के

Web Title: Will sugar sowing or caste issue be important in Hatkanangle Lok Sabha Constituency?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.