शिवसेना-भाजपाकडून स्वतंत्रपणे सत्तेची गणिते

By Admin | Published: February 24, 2017 07:15 AM2017-02-24T07:15:45+5:302017-02-24T07:15:45+5:30

उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढल्याने आणि निकालानंतर कोणाच्याच हाती पूर्ण बहुमत नसल्याने एकतर

Independent power calculations from the Shiv Sena-BJP | शिवसेना-भाजपाकडून स्वतंत्रपणे सत्तेची गणिते

शिवसेना-भाजपाकडून स्वतंत्रपणे सत्तेची गणिते

googlenewsNext

पंकज पाटील /उल्हासनगर
उल्हासनगरमध्ये शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे लढल्याने आणि निकालानंतर कोणाच्याच हाती पूर्ण बहुमत नसल्याने एकतर दोन्ही पक्षांनी एकत्र येणे किंवा छोटे पक्ष, अपक्षांना सोबत घेण्यावाचून दोघांनाही पर्याय उरलेला नाही. शिवेसना-भाजपाने एकत्र येणे मुंबईच्या निकालावर अलवंबून असल्याने तोवर दोन्ही पक्षांनी काही नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
उल्हासनगरमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला, तरी सत्तेसाठी त्यांनाही कसरत करावी लागणार आहे. सत्तेच्या गणितात माहीर असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यातून उसंत मिळताच शिवसेनेतर्फे लागलीच उल्हासनगरवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपापेक्षा जागा कमी असल्या, तरी भाजपाला सोडून इतर पक्षांना एकत्रित करुन सत्तेचे गणित जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुंबई आणि ठाण्यातील गणितांवर आणि निर्णयावर अवलंबून न राहता उल्हासनगरमध्ये जेवढे नगरसेवक गळाला लावता येतील, त्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाल्याचे समजते.
सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक आकडा भाजपाकडे नाही. तो गाठण्यासाठी भाजपाचेही प्रयत्न सुरू आहेत. भाजपाकडे कमळाच्या चिन्हावरील ३२ विजयी उमेदवार असून पीपल्स रिपब्लीकन पार्टी, भारिप आणि भाजपा पुरस्कृत एक नगरसेवक मोजल्यास त्यांची संख्या ३५ होते. त्यांना आणखी पाच नगरसेवकांची गरज भासणार आहे. साई पक्षाने कलानी गटाच्या विरोधात निवडणूक लढविल्याने तो पक्ष सहजासहजी भाजपाकडे वळणार नाही, असा अंदाज होता. पण ओमी स्वत: निवडून न आल्याने साई पक्षाचा कलानी विरोध कितपत टिकतो, ते पाहणे महत्वाचे आहे. त्यातही भाजपा हा राज्यात आणि केद्रातील सत्तेत असलेला पक्ष असल्याने तोवर राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एक अशा पाच नगरसेवकांना फोडण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून त्या नगरसेवकांना भाजपासोबत जाता येणार नाही, हे गृहीत धरून या संदर्भातील प्राथमिक बोलणी सुरु करण्यात आली आहे.
केवळ साईचे जीवन ईदनानी यांना सोबत घेऊन शिवसेनेची सत्ता स्थापन होणार नाही. त्यामुळे शिवसेनेनेही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांवर जाळे फेकण्याची तयारी केली आहे. शिवसेनेचे २५, साई पक्षाचे ११ आणि रिपाइंचे २ अशा ३८ नगरसेवकांचे बळ तयार करुन राष्ट्रवादी, काँग्रेसला कह्यात घेण्याचा प्रयत्न शिवसेनतर्फे केला जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेची गणिते पालकमंत्री एकनाथ शिंदे ठरवत आहेत. ठाण्यात शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाल्याने त्यांनी आपले लक्ष उल्हासनगरवर केंद्रीत केले आहे. मुंबईत युती झाल्यास ठाणे व उल्हासनगरमध्येही युती होण्याची शक्यता आहे. मात्र मुंबईबाबत निर्णय प्रलंबित असल्याने आणि भविष्यात युतीचा निर्णय न झाल्यास उल्हासनगरची सत्ता गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी शिवसेनेने आत्ताच तयारी करुन ठेवली आहे. भाजपाकडे आकडा जास्त असला, तरी त्यांच्याकडे साई आणि राष्ट्रवादी सहज वळणार नाही याची कल्पना भाजपाच्या नेत्यांनाही आहे. मात्र हेच दोन्ही पक्ष वेळेवर शिवसेनेसोबत जाऊन कलानी आणि भाजपा यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळेच मुंबईच्या निर्णयाची वाट न पाहता सेनेतर्फे शिंदे यांनी आपली यंत्रणा कामाला लावली असून येत्या दोन दिवसांत त्या बाबतच्या बैठकांचे सत्रही सुरू होईल. सत्तेच्या या गणितात साई पक्षाचे शिवसेनेला झुकते माप असेल, हे निवडणुकीपूर्वीपासूनच निश्चित मानले जात आहे. मात्र भाजपाचे काही पदाधिकारी साईला सत्तेचा समान वाटा देऊन आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे साई पक्षाच्या भूमिकेवर सत्तेची गणिते ठरतील.
साईसोबत चर्चा यशस्वी न झाल्यास किंवा त्यांनी अवास्तव मागण्या केल्यास शिवसेना आणि भाजपा कमीपणा घेऊन युती करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कलानींना दूर ठेवण्याचे प्रयत्न
भाजपाने ओमी कलानी टीमला घेऊन शिवसेनेविरोधात निवडणूक लढविल्याने कलानी पर्वाचा अस्त करण्यासाठी शिवसैनिक भाजपाच्या विरोधात ठाकले होते. कलानीविरोधामुळे विजयी उमेदवारांची भाजपासोबत जाण्याची इच्छा नसली, तरी पक्षाच्या आदेशावर शिवसेना चालत असल्याने कोणीही उघडपणे आपली मते मांडत नाही.

मात्र शिवसेना-भाजपा यांनीच एकत्र यावे, असे आदेश येतील तेव्हा पाहू अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. प्रत्यक्षात ओमी कलानी निवडून आलेले नाहीत. त्यातही त्यांचा बहुतांश गट हा कमळ चिन्हावर निवडून आला आहे.

त्यामुळे तो कलानी गट म्हणून ओळखला न जाता यापुढे भाजपा म्हणूनच ओळखला जाईल. त्यामुळे ओमी यांना बाजुला ठेवल्यास भाजपाला साई पक्षाशीही वाटाघाटी करता येतील किंवा शिवसेनेलाही सोबत घेता येतील, अशीही चर्चा रंगली आहे.

Web Title: Independent power calculations from the Shiv Sena-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.