कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 03:48 PM2024-05-04T15:48:03+5:302024-05-04T15:50:19+5:30

मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत

The number of travelers coming to Konkan during summer holidays is more | कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार

कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार

रत्नागिरी : काेकण रेल्वेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाल्याने या मार्गावरील गाड्यांना प्रवाशांची माेठी गर्दी असते. सण, उत्सवाबराेबरच उन्हाळी सुटीत काेकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने मध्य आणि कोकण रेल्वेवरील नियमित रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी २०० पेक्षा अधिक असते. मात्र, गेल्या आर्थिक वर्षात जनशताब्दी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस गाड्यांची प्रतीक्षा यादी प्रत्येकी ७६ हजार पार गेली होती. तसेच मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत सुमारे ५ लाख प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

काेकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच प्रतीक्षा यादी सुरू होते. १ एप्रिल २०२३ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत एकूण ४ लाख ७३ हजार ९४८ प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळाली नाहीत. साधारणपणे एका दिवसाला सरासरी १,४९० प्रवासी प्रतीक्षा यादीत होते. मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६,४३७ इतकी असून, त्यातील ६८,५५५ प्रवासी द्वितीय श्रेणी डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते.

दुसऱ्या स्थानावर मुंबई-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस असून, या गाडीची प्रतीक्षा यादी ७६,०१८ इतकी असून, यामधील ६०,६४२ प्रवासी हे शयनयान डब्यांच्या प्रतीक्षा यादीत होते. या दोन्ही एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी ७६ हजार पार गेली होती.

सध्या सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीची प्रतीक्षा यादी ४०० पार झाली आहे. तर, २८ एप्रिलपासून ते १५ मेपर्यंत अनेक दिवसांतील प्रतीक्षा यादीचीही क्षमता संपली आहे. तसेच सीएसएमटीवरून मडगावला जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसच्या शयनयान डब्यांची प्रतीक्षा यादी ३०० ते ४०० दरम्यान आहे.

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची एकूणच प्रतिदिन प्रतीक्षा यादी आणि सर्वसाधारण तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहून रेल्वे प्रशासनाने चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीसाठी कायमस्वरूपी वाढीव रेल्वे सोडणे आवश्यक आहे. तसेच या फेऱ्या सीएसएमटी, एलटीटी, दादर, पुणे, नागपूर येथून सोडल्यास प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. - जयवंत दरेकर, संस्थापक अध्यक्ष, काेकण विकास समिती.

Web Title: The number of travelers coming to Konkan during summer holidays is more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.