Lok Sabha Election: ज्या १०२ जागांसाठी आज मतदान, २०१९ मध्ये भाजपा-काँग्रेसनं किती जिंकल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 04:01 PM2024-04-19T16:01:01+5:302024-04-19T16:04:21+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला होतंय. या टप्प्यात २१ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर जवळपास १६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या पहिल्या टप्प्यात १६०० उमेदवार रिंगणात असून त्यात १३४ महिला आणि १४९१ पुरुष उमेदवार आहेत.

२१ राज्यातील या १०२ जागांसाठी दुपारी १ वाजेपर्यंत ३६.९६ टक्के मतदान झाले आहे. त्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान बंगालमध्ये ५०.९६ टक्के झालं आहे. लक्षद्वीपमध्ये मतदानाचा वेग सर्वात कमी असून इथे १ वाजेपर्यंत २९.९१ टक्के मतदान झाले.

पहिल्या टप्प्यात ९ केंद्रीय मंत्री आणि २ माजी मुख्यमंत्री यांचे भवितव्य मतपेटीत सील होणार आहे. मतदानाचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ९ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री आणि देशाचे एक माजी राज्यपाल यांचे भवितव्य ईव्हीएममध् बंद होईल. या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासोबतच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या ९२ विधानसभा जागांवरही मतदान होत आहे.

या टप्प्यातील २० ते २९ वयोगटातील मतदारांची संख्या पाहिली तर ही संख्या ३.५१ कोटी आहे. या टप्प्यात १०२ जागांवर मतदानासाठी १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असतील, ज्यांच्या सर्व जागांसाठी आज मतदान होणार आहे.

आता एकदा या जागांवर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर त्यात भाजपानं ४० काँग्रेसनं १५ तर डिएमकेनं २४ जागांवर विजय मिळवला होता.पहिल्या टप्प्यातील ९ अशा जागा आहेत ज्या भाजपा आणि काँग्रेसचा गड मानले जातात. या ९ जागांवर सातत्याने भाजपा किंवा काँग्रेस जिंकत आली आहे. तामिळनाडूतील ३९ जागांवर आज मतदान होतंय. भाजपानं २०१९ च्या निवडणुकीत या राज्यात एकाही जागेवर विजय मिळवला नव्हता. त्यामुळे यातील काही जागा पारड्यात पाडणं भाजपासाठी आव्हान आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या १०२ जागांपैकी भाजपाने सुमारे ४० टक्के जागा जिंकल्या, तर काँग्रेसने सुमारे १५ टक्के जागा जिंकल्या. मात्र, या लोकसभा निवडणुकांचे निकाल युतीच्या दृष्टीने पाहिल्यास त्या निवडणुकीत एनडीए आणि इंडिया आघाडीचा वाटा कमी-अधिक प्रमाणात समान होता.

अशा स्थितीत या दोन्ही आघाड्यांसमोर आपली २०१९ ची कामगिरी कायम राखण्याचेच नव्हे तर या जागांवर जागा वाढवण्याचे आव्हान आहे. या १०२ जागांवर होत असलेल्या मतदानात यावेळी भाजपा २०१९ च्या तुलनेत जास्त जागांवर निवडणूक लढवत आहे.

या १०२ जागांपैकी ७७ जागांवर भाजपाने आपले उमेदवार उभे केले आहेत. तर, बसपा १०२ पैकी सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यांनी ८६ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने ५६, द्रमुकने २२, एआयएडीएमकेने ३६, आरजेडीने ४, सपा ७ आणि टीएमसीने ५ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या १०२ जागांपैकी भाजपाने ६० जागांवर उमेदवार उभे केले होते आणि काँग्रेसने ६५ जागांवर उमेदवार उभे केले होते. अशा स्थितीत, यावेळी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २०१९ च्या तुलनेत अधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसने मागील निवडणुकीपेक्षा कमी जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

या १०२ जागांपैकी ५३ अशा जागा आहेत ज्यांवर २०१९ मधील विजय आणि पराभवातील अंतर २० टक्क्यांपेक्षा कमी होते. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि सहारनपूर, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, नागालँड, मिझोराम आणि तामिळनाडू अशा ८ जागा होत्या, जिथे विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील मताधिक्य २ टक्क्यांपेक्षा कमी होते.