समाजासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय ?

By Admin | Published: March 15, 2017 06:46 PM2017-03-15T18:46:49+5:302017-03-15T19:24:02+5:30

निर्माण आणि आॅक्सिजन उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब..

What is the purpose of working for society? | समाजासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय ?

समाजासाठी काम करायचं म्हणजे नेमकं काय ?

googlenewsNext

निर्माण आणि आॅक्सिजन उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरं तर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं. गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७००हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल.. त्यातला हा तिसरा प्रश्न : समाजासाठी काम म्हणजे नेमकं काय करायचं?

गरज

कुणी सांगितलं फक्त समाजाची आहे?

कर्कश आवाजात चालणारी क्रे न. त्यामागे कचऱ्याचा भलामोठा ढीग. भर उन्हात त्यातून रस्ता शोधत, वाटेत मिळणारे प्लॅस्टिक आणि काच वेचत भटकणारे १०-१२ वर्षांचे भाऊ-बहीण. जेजुरी या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध देवस्थानातील डम्पिंग ग्राउण्डवरचं हे दृश्य. त्या दोघांना जवळ बोलावून मी विचारपूस केली तेव्हा माहिती झाले की त्या दोघांच्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह या डम्पिंग ग्राउण्डवर चालतो. मोठा सूरज परिस्थितीमुळे शाळेतून बाहेर पडला, तर लहानग्या गौरीने कधी शाळेचा वर्ग पाहिलाच नाही. रोज दिवसाच्या शेवटी पैसे मिळत असताना आणि दुसरा कोणताही उत्पन्नाचा मार्ग नसताना त्यांच्यासाठी अशा खालावलेल्या आणि घातक परिस्थितीत काम करण्याची वेळ आली. का त्या दोघांच्या नशिबी हे सारं? पण मग मी विचार केला, यात फक्त त्यांच्या नशिबाची चूक आहे का? काही मिनिटांपूर्वी उभा होतो त्या डम्पिंग ग्राउण्डवर पडलेली एक एक गोष्ट माझ्या डोळ्यासमोरून सरकू लागली. झटपट खाऊन मग कारच्या खिडकीतून फेकून दिलेली प्लॅस्टिकची प्लेट आणि चमचा, एकदा वापरून कचऱ्यात भिरकावलेली काचेची बाटली, दुरु स्त करण्याचा त्रास न घेता सहजच टाकून दिलेल्या अगणित वस्तू. कुठून आलं असेल हे सगळं? शोधलं तर कळालं की, सूरज किंवा गौरीला आरोग्य धोक्यात टाकून उचलाव्या लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी माझ्यासारख्याच कोणाच्यातरी औदासिन्यामुळे तिथे आलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं नशीब ही एकच गोष्ट त्यांच्या परिस्थितीला कारणीभूत म्हणणं यासारखा दुसरा उद्दामपणा नाही. यात माझासुद्धा काहीतरी वाटा आहे. आणि म्हणूनच यावर तोडगा काढण्याची जबाबदारीसुद्धा माझीच आहे. सामाजिक कामाची याहून वेगळी काय गरज वाटावी लागेल? मला नशिबानं मिळालेलं समाजातील काही घटकांना जर मेहनतीनेही मिळत नसेल, तर मी नक्कीच त्याबाबत काहीतरी करणं गरजेचं आहे असं मी समजतो. सामाजिक काम म्हणजे गुंतागुंतीच्या आयुष्यातला एका वेगळ्या पातळीवरचा संसार आहे. त्यात आपल्या वैयक्तिक समस्यांच्या आधी प्राधान्यानं जेव्हा समाजातल्या प्रश्नांवर माणूस काम करायला सुरु वात करतो, तेव्हा या वेगळ्या संसाराची सुरु वात होते. काही जबाबदाऱ्या कितीही अनोळखी वाटत असल्या तरीही त्या पूर्णत: माझ्याच आहेत. सामाजिक काम ही फक्त समाजापुरती करायची गरज नाही, तर तितकीच एक वैयक्तिक अर्थात माझी गरज आहे ही गोष्ट मला मनोमन पटली...

- विवेक पाटील, निर्माण

 

का?

या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचं, आपल्यासाठीच!

‘सामाजिक काम’ म्हणजे समाजाच्या भल्यासाठी व समाजपरिवर्तनासाठी स्वत:चा स्वार्थ बाजूला ठेवून केलेलं नि:स्वार्थी आणि निर्भीड काम. माणूस ज्या समाजात राहतो त्यामध्ये त्याला अनेक कमतरता किंवा उणिवा जाणवू शकतात. पण सर्वच प्रश्नांवर तो एकटा काही तोडगा काढू शकणार नाही याची जाणीव असूनदेखील ते प्रश्न सोडवण्यासाठी माणूस प्रयत्नशील असतो. ते काम करून त्याला आनंद मिळतो. त्यासोबतच स्वत:च्या कामातून समाजाच्या एखाद्या घटकाला तो वेगळा आयाम देऊ शकत असेल तर नक्कीच ते काम सामाजिक कामाच्या व्याख्येत येतं, असं माझं मत आहे. आज आपल्या अवतीभवती बरेच लोक असतात जे सरळ एखाद्या सामाजिक प्रश्नावर काम करताना दिसत नाहीत; पण ते आपलं काम नित्यनियमाने, इमानदारीने व तत्त्वं पाळून करत असतील तर तेदेखील एक प्रकारचं सामाजिक कामच करत असतात. समाजासाठी काम कुणीही, कधीही, कुठेही करू शकतं. हे काम करण्यासाठी काही वेगळं रूप धारण करण्याची गरज मला वाटत नाही. रस्त्यावर रोज पडणारा कचरा तो एखादा कुणी ना कुणी साफ करणारच हे माहिती असूनसुद्धा सफाई कामगार जर मनापासून तो कचरा साफ करत असेल तर माझ्या मते तो सामाजिक कामच करतोय. एखादा डॉक्टर जर रुग्णाला औषधांसोबत आधाराचे दोन शब्द बोलून धीर देत असेल, रुग्णाची फसवणूक न करता उपचार करत असेल तर तेसुद्धा सामाजिक कामच करतात असं माझं मत आहे. आपण सर्व प्रश्नांवर थेट काम करू शकणार नाही, पण त्यावर आपल्याला शक्य असलेले प्रयत्न नक्कीच करू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर कचरा व्यवस्थापनावर जरी मी थेट काम करत नसले तरी घरातून निघणारा कचरा जर वर्गीकरण करून ओला आणि सुका वेगळा करून दिला व सोबतच प्लॅस्टिकचा वापर कमी केला तर तेही एक समाजासाठीचंच काम आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की मला आयुष्यात पडलेल्या ‘का’ या प्रश्नाचं उत्तर शोधणं महत्त्वाचं. मी कुठलंही काम का करायचं याचं उत्तर मिळालं की ते कसं करायचे हे आपोआप कळतं. निर्माणच्या शिबिरात डॉ. अभय बंग म्हणाले होते की, ‘आपल्या असण्याचा आणि जगण्याचा कुणालातरी फायदा व्हायला हवा. नाहीतर किड्या मुंगीसारखे तर हजारो लोक जगतात आणि मरतातदेखील. बऱ्याचदा फक्त पैसा कमवणं यासाठी ते आपल्या आवडीचं जगणं हरवून बसतात. ते हरवलं की दुसऱ्यासाठी काही केलं की त्यातून आनंद मिळतो अशी भावनाच मनात येत नाही. कारण आपण आपल्या आयुष्याचीच उकल नीट केलेली नसते, मग लोकांचा विचार कधी करणार? आपला प्रवास स्वभान ते समाजभान असा होत असतो. पण स्वत:चंच जर भान नसेल तर सामाजिक भान कधी येणार?’ माझ्या मते आपण करत असलेल्या सामाजिक कामाची व्याप्ती ही जितकी सीमित तितकीच मोठीदेखील असू शकते. कारण सामाजिक कामाची अशी वेगळी कंपनी नाहीये जिथं जाऊन तुम्ही ते करू शकता. त्यासाठी कुठली वेगळी डिग्री लागत नाही. खरंतर आपला समाज हा आपल्या घरापासून व त्या घरात आधी आपल्यापासून सुरू होतो. समाजपरिवर्तनासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतील तर ते स्वत:पासून करायला हवेत.

- श्वेता वानखेडे, निर्माण 

 

जागर

व्यवस्था आणि माणसं घडवणं अधिक महत्त्वाचं!

आपण पाहिलेल्या सर्वात असहाय्य माणसाचा चेहरा आठवावा आणि चेहऱ्यावर हसू उमलेल असं काही करावं तेच खरं समाजकार्य, या गांधीजींच्या विचाराने मीदेखील प्रभावित झालो आहे. त्या शेवटच्या असहाय्य माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे असंख्य मार्ग असू शकतात. ज्यानं-त्यानं आपली आवड, क्षमता आणि समाजातील गरज ओळखून त्यानुसार आपला मार्ग निवडावा. मी गावात राहून शेतकऱ्यांसोबत पाण्याचे पाट काढले, दारिद्र्य आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांचं संशोधन केलं, दिल्लीत जाऊन जनवकालत केली, अर्थक्र ांतीच्या बाजूने लिखाणही केलं, सॉफ्टवेअर्स बनवून जग बदलता येतं का हेही चाचपलं, बचतगटांमार्फत उद्योजगता वाढवण्याचा प्रयत्न केला, दलित-आदिवासी-महिला चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सोबत केली, त्यांना बदलत्या परिस्थितीचं भान यावं म्हणून अभ्यासगट केले. या प्रवासात मी हे शिकलो की तळागाळातल्या लोकांना बदल हवा आहे. त्यासाठी ते प्रयत्नही करताहेत आणि तेच परिवर्तनपण आणतील. त्यांना सोबत करणं, बळ देणं हा आजच्या परिस्थितीत सामाजिक कामाचा योग्य मार्ग आहे. नागरिकत्व, पर्यावरण संवर्धन, स्त्री-पुरु ष समानता, आर्थिक विकासासाठी शेती, जंगलावर आधारित उद्योगांची वाढ अशा विषयांवर समाजात जागर घडवणं अतिशय आवश्यक आहे. पण नुसती माहिती देऊनही कामं होणार नाहीत. बदल घडवण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी व्यवस्था उभ्या कराव्या लागतातच. त्याला पर्याय नाही. लोकसहभागातून अशा शाश्वत विकासाच्या व्यवस्था निर्माण करणं अतिशय गरजेचं आहे. व्यवस्था निर्माण करणं आणि अशा व्यवस्था चालवू शकणारी माणसं घडवणं हे मला सर्वात महत्त्वाचं सामाजिक कार्य वाटतं.

- कल्याण टांकसाळे, निर्माण

 

सामाजिक काम म्हणजे ‘काहीतरी वेगळं’ हा विचारच मला मुळात चुकीचा वाटतो. मला कोणत्या प्रकारचं काम करायला आवडतं, मला ज्यात आनंद मिळतो ते मी करणार या माझ्या विचाराचा मी आदर करते, इतकंच. मला लोकांच्यात राहून त्यांचे प्रश्न समजून घ्यायला आवडतं. आणि ते प्रश्न कसे सोडवता येतील, त्यांचं आयुष्य अजून सुखकर कसं होईल आणि ते करताना मलाही आनंद मिळेल, शिकायला मिळेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान मिळेल. हा विचार आणि त्या दृष्टीने केलेली कृती म्हणजेच माझ्या दृष्टीने सामाजिक काम.

- प्रणाली सिसोदिया निर्माण

Web Title: What is the purpose of working for society?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.