आवरा

By admin | Published: May 26, 2016 11:55 PM2016-05-26T23:55:54+5:302016-05-26T23:55:54+5:30

आपण आपल्या मोबाइलच्या ‘जाळ्यात’ पूर्ण अडकत चाललोय,

Aapra | आवरा

आवरा

Next

 - मुक्ता चैतन्य

(muktachaitanya11@gmail.com)
आपण आपल्या मोबाइलच्या
‘जाळ्यात’ पूर्ण अडकत चाललोय,
व्यसनात गुरफटतोय हे तर समजलं,
पण ही व्यसनासारखीच सवय सोडायची कशी?
आवरायचं कसं स्वत:ला?
उपाय काय?
 
मनावर थोडा ताबा, आणि मेंदूला अधिक सकस, अधिक आनंददायी खुराक या दोन गोष्टी जमल्या तर हे ‘स्मार्ट’नेसचं तांत्रिक व्यसन नक्की सुटू शकेल!
 
मोबाइल वापरण्यात, फोटो काढण्यात, गेम खेळण्यात, व्हॉट्सअॅप चॅट करण्यात आणि त्यावर आलेले फोटो-मेसेज डिलीट करण्यातच आपला किती वेळ जातो..
म्हणजेच काय तर एक वेगवान उपकरण आणि तंत्रज्ञान आपल्या हातात आलं पण ते वापरायचं कसं याची साक्षरता काही आपण शिकून घेतली नाही.
सत्तरच्या दशकानंतर घरोघर टीव्ही आला. मग खासगी चॅनल्स आले, घरातल्या बैठकीच्या खोलीचा चेहरा मोहरा बदलला. टीव्ही जगण्याचा भाग झाला पण तो टीव्ही कसा पाहावा याचीही साक्षरता अजून आपल्याला आलेली नाही. आपण तासन्तास त्यापायी वाया घालवतो आहोतच. आणि आता तर काय संगणकाच्या माध्यमातून इंटरनेट नावाची अलीबाबाची गुहाच सापडली. अचानक जगबिग एकदम जवळबिवळ आलं. दूरच्या देशी निघून गेलेल्यांना पत्र न पाठवता, फोन न करता, ई-मेल करणं अगदीच सोप्पं होऊन गेलं. कसलीही आणि काहीही माहिती हवी असेल तर गूगल नावाची मास्टर कि पण हाताशी लागली. पण या सगळ्या गडबडीत इंटरनेट नावाचं वेगवान माध्यम नेमकं हाताळायचं कसं हे सांगायचं-शिकवायचं मात्र सगळ्यांचंच राहून गेलं..
 मोबाइल नामक यंत्र हाताशी आलं. आणि पूर्वी फक्त कॉम्प्युटरवर उघडणारी इंटरनेटची विंडो मोबाइलच्या चिमुकल्या स्क्र ीनवर पण उघडायला लागली. जग बदललं म्हणता म्हणता एकदम ‘स्मार्ट’ झालं. जग तर अगदी हाकेच्या अंतरावर आलं, अॅप्सच्या दुनियेत आपण रमलो. गेमिंगमुळे वेळ घालवायला दुस:या माणसाची गरजच उरली नाही. जिथे असू तिथे बातम्या, अपडेट्स, हवामानाचा अंदाज, मित्र-मैत्रिणींशी गप्पा, फोटो, शेअरिंग, स्टेटस अपडेट यासा:यात गुंतत त्या फोनबरोबर आपणही स्मार्टबिर्ट झालो.
पण पुन्हा तेच; या सगळ्या गडबडीत नव्यानं हाताशी आलेलं हे स्मार्ट माध्यम वापरायचं कसं, हे शिकणं मात्र आपलं राहूनच गेलं.
 याच अशिक्षितपणाचा दुष्परिणाम म्हणजे आजची माध्यम-व्यसनं! 
जागतिक पातळीवर या व्यसनांपासून लोकांना दूर कसे ठेवता येईल यासाठी अभ्यास सुरू आहेत. हा कॉलम लिहायला लागल्यापासून यासंदर्भातले अभ्यास, हे अॅडिक्शन सोडवण्यासाठीचे उपाय याविषयी वाचताना लक्षात आलं की, आपण काही सोपे उपाय केले तर या व्यसनांपासून लांब राहू शकतो. हा कॉलम वाचणा:या अनेकांनीही आम्हाला काही उपाय सुचवा, अशी मागणी केली होती.
त्यासाठी आज ही चर्चा.
आपल्याला काय करता येईल याची.
 
 
ज्यांना सेल्फी काढण्याचा 
सोस आहे त्यांच्यासाठी..
 
सेल्फी. सतत स्वत:चे फोटो काढण्याचा मोह ज्यांना होतो, जे आकंठ स्वप्रतिमेच्या प्रेमात, त्यांनी हे करून पाहावं.
 
* कितीही मोह झाला आणि स्वत:चे फोटो काढले तरी ते अपलोड करू नका. किंवा पूर्वी करायचात त्याच्या निम्मेच करा.
 हळूहळू हे स्वत:चेच फोटो काढण्याचं आणि अपलोड करण्याचं प्रमाण कमी करत नेणं, हाच पहिला टप्पा.
* सेल्फी काढण्याचा कितीही मोह झाला तरी सेल्फी काढू नका. एखादा स्पेशल दिवस, स्पेशल भेटी यांचे अपवाद वगळता उगाच येता-जाता सेल्फी काढावीशी वाटत असेल तरी तसं करू नका. नाही म्हणजे नाहीच, हा दुसरा टप्पा.
*  फोटो काढण्यासाठी आणि चांगल्या पोजसाठी आपण किती वेळ घालवताय ते बघा. तो वेळ कमी करत न्यायचा आहे हे मनाशी ठरवा. काल तीन-चार तास घालवले असतील तर रोज 15 मिनिटे कमी करत न्या. म्हणजे हळूहळू या गोष्टीमध्ये वेळ जाणं बंद होईल.
जे तासन्तास
ऑनलाइन पडीक आहेत त्यांच्यासाठी..
 
* सकाळी उठल्याबरोबर मोबाइल हातात घेऊ नका. कुठलेही अपडेट्स चेक करू नका. सुरु वातीला जरा चुकचुकल्यासारखं होईल पण होऊ देत. सकाळी उठल्यावर एखादा आवडीचा व्यायाम करा म्हणजे फोनची आठवण येणार नाही. 
* चहा-नास्ता, पेपर वाचन करतानाही जवळ फोन नकोच. नाहीतर समोर पेपर, हातात चहा  आणि लक्ष सगळं आपल्या पोस्टला किती लाइक मिळाले इकडे.
* दिवसातून किती वेळ आपण अपडेट्स चेक करण्यासाठी देणार आहोत हे ठरवून घ्या. आणि तितकाच वेळ द्या.
*सोशल मीडियावरच्या ज्या ग्रुप्समध्ये तुम्ही अॅक्टिव्ह नाही ते सरळ म्यूट करा. फोन वाजलाच नाही कीबघण्याचा मोहही होत नाही. ज्या ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह आहात, तिथेही सतत काय चाललंय हे बघण्याची गरज नसते. कामातून ब्रेक घेतल्यावर दोन-चार मिनिट बघा.
*आठवडय़ातून एकदातरी सगएया मित्र-मैत्रिणींना भेटा. जेणोकरून संपूर्णपणो सोशल मीडियावर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही.
*ताण जावा म्हणून गेम्स खेळत असाल तर गेम्समुळे ताण जातो हा गैरसमज आधी दूर करून टाका. मोबाइल गेम्स खेळण्याने फक्त ताण गेल्याचा भास होतो. प्रत्यक्षात मनावरचा ताण वाढतो.
* आपलं कौतुक व्हावं, आपण आपल्या गोष्टी शेअर कराव्यात हे वाटणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा या इच्छेला आग्रहाची किनार येते आणि कौतुक न करणा:यांविषयी मनात राग निर्माण होतो तेव्हा गडबड आहे हे समजा. तसंच, अपेक्षित कौतुक झालं नाही तर असुरक्षित वाटत असेल तर तेही धोकादायक आहे हे लक्षात घ्या. यावर एकाच उपाय असतो तो म्हणजे स्वत:कडे त्रयस्थ नजरेतून बघायला शिकलं पाहिजे. इतरांनी केलेल्या गोष्टीच कौतुक केलं पाहिजे.
* भरपूर वाचन, उत्तम सिनेमे बघणं, भटकणं, दोस्तांशी गप्पा या गोष्टींमुळे सोशल मीडियाची गरज कमी होऊ शकते. त्यासाठी आपला छंद ओळखून जो जपा.
* जेवताना मोबाइल लांब ठेवा. कितीही वाजला तरी अत्यावश्यक कॉल्स खेरीज काहीही बघू नका.
*  सगळ्यात महत्त्वाचं रात्री फोन बंद किंवा म्यूट करण्याची वेळ ठरवून घ्या. हल्लीचे फोन स्मार्ट असल्यानं अत्यावश्यक फोनची तेवढी रिंग वाजण्याचे पर्याय उपलब्ध असतात, ते वापरा. रात्री मोबाइल वाजला नाही की झोपही शांत लागते आणि झोप येत नाही म्हणून मोबाइल आणि मोबाइल वाजला म्हणून झोपमोड या विचित्र चक्रातून सुटका होऊ शकते.
ज्यांना फॉरवर्ड करण्याचं व्यसन जडलंय
त्यांच्यासाठी..
 
* सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली बौद्धिक क्षमता ही आपण काय फॉरवर्ड करतो यावरून ठरत नाही. त्यामुळे स्वत:ला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करण्यासाठी फॉरवर्ड नावाचं माध्यम आपल्याला मिळालेलं आहे असं कुणाला वाटत असेल तर तो त्याचा भ्रम आहे.
*एखादी कविता, जोक, माहितीपर लेखन खरंच खूप आवडलं आणि इतरांनाही ते आवडेल याची खात्री असेल तरच ते फॉरवर्ड करायचं, असा नेम घालून घ्या.
*शिवाय आपण कोणत्या ग्रुपमध्ये काय फॉरवर्ड करतोय याचं भान राखायलाच हवं. फॉरवर्ड बंदी असलेल्या ग्रुपवर फॉरवर्ड करत राहाणं, असभ्यपणाचं तर आहेच पण अशिक्षितपणाचही लक्षण आहे.
*गालिब, ग्रेस आणि गुलजार यांच्या नावाने काय वाट्टेल ते फॉरवर्ड होत असतं. या तिघांचं सगळं लेखन आपल्याला माहीत असण्याचं कारण नाही पण तरीही आलेल्या कवितेचा दर्जा, शब्दांचा वापर यावरून ती या तिघांची असेल किंवा नाही याचा अंदाज येऊ शकतो, फॉरवर्ड करण्याआधी तो घ्यायला हवा.
* जी गोष्ट कवितांची तीच साहित्यिक, राजकारणी आणि समाजकारणी यांच्याही बाबतीत. खोटे किंवा चुकीचे किस्से, वक्तव्य सर्रास फॉरवर्ड केली जातात. कुणाच्या नावावर काहीही खपवलं जातं. खपवणारा ते का करत असतो, त्यामागचा त्याचा हेतू काय असतो, आपल्याला ठाऊक नसतं पण आपण मात्र त्याच्या खपवाखपवीचं माध्यम बनतो. त्यामुळे फॉरवर्ड करताना सावधान!
* आपण सुप्रभात आणि सुविचार सकारात्मकतेसाठी पाठवत असतो. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच! सुविचार आणि सुप्रभातचा अतिरेक झाला की त्यातून मन प्रसन्न होण्याऐवजी मनावरचा ताण वाढून माणसं उबगतात. वैतागतात आणि शेवटी नकारात्मक भावना निर्माण होते. त्यामुळे या गोष्टी कुणालाही पाठवण्याचा सपाटा लावू नका.
* शक्यतोवर फॉरवर्डची ढकलगाडी थांबवा.
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
( ही लेखमाला आता थांबवत आहोत.)
 
 
 

Web Title: Aapra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.