कुलदीपमुळे भारताची पकड कायम
By admin | Published: March 26, 2017 12:55 AM2017-03-26T00:55:35+5:302017-03-26T00:55:35+5:30
उजव्या हाताने फिरकी मारा करणाऱ्यांच्या तुलनेत डावखुरे फिरकीपटू मनगटाला पुरेसे वळण का देत नाहीत
हर्षा भोगले लिहितो..
उजव्या हाताने फिरकी मारा करणाऱ्यांच्या तुलनेत डावखुरे फिरकीपटू मनगटाला पुरेसे वळण का देत नाहीत, हा माझ्यासाठी नेहमी उत्सुकतेचा विषय राहिला आहे. हेदेखील कौशल्य आहे. कुठल्याही हाताने फिरकी मारा करा, त्यात बोटांची कमाल असतेच; पण जो नजरेत भरेल, मनगटाचे कौशल्य दाखविणारा, असा डावखुरा गोलंदाज भारतात आतापर्यंत पाहायला मिळाला नव्हता.
मी कुलदीप यादवबद्दल बोलतो आहे. दुबईत ३ वर्षांपूर्वी १९ वर्षे गटाच्या विश्वचषकात कुलदीपचा मारा पाहायला मिळाला. तो फारच कोवळा होता. चायनामॅन आणि गुगली गोलंदाजी करीत असला, तरी फारच मंद वाटला. मागच्या वर्षी मात्र त्याच्या चेंडूत वेग जाणवला. या सुधारणेमुळेच आज तो भारतीय संघात दाखल झाला असावा.
धरमशालाच्या खेळपट्टीवर त्याचा अप्रतिम मारा पाहून कोणाही युवा गोलंदाजाला कुलदीपसारखी गोलंदाजी करायला आवडेल. यादवने हँड्सकोंबला टाकलेला तो चेंडू पाहिल्यानंतर विस्मयकारकता जाणवली. फुललेंथ चेंडूवर हँड्सकोंबला ड्राईव्हचा फटका मारायचा होता; पण काही सुचण्याआधीच चेंडू त्याची दांडी गुल करून गेला. मॅक्सवेल तर यादवची लेगस्पिन गुगली समजूदेखील शकला नाही. तोदेखील बोल्ड झाला. कुलदीपचा हात आणि चेंडू सोडण्याचे कौशल्य अतिशय नाट्यमय आहे. हे कौशल्य पाहणेदेखील रंजक ठरते. या बळावर कुलदीप आंतरराष्ट्रीय स्तरावर फार लोकप्रिय तसेच यशस्वी ठरू शकतो.
स्टीव्ह स्मिथने मालिकेत आज तिसऱ्या शतकाची सहजपणे नोंद करताच आॅस्ट्रेलिया धावडोंगर उभारेल, असे दिसत होते. कुलदीपने मात्र त्यांचे स्वप्न धुळीस मिळवून भारताला चढाओढीत परत आणले. स्मिथच्या शतकानंतरही पाहुण्यांना ३०० वर थोपविण्यात यश मिळाले ते कुलदीपमुळेच.
भारताच्या वाट्याला जे एक षटक खेळण्याचा योग आला. त्यात हेजलवूडचे चेंडू उसळी घेताना दिसले. भारतीय गोलंदाजांनी निर्णायक कसोटीत फलंदाजांसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. आज रविवारचा दिवस फलंदाजांचा असेल. मोठी खेळी करायची झाल्यास बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर सावध राहावे लागेल. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा मोहदेखील आवरावाच लागेल.