मनपात एका वारस हक्कावर दोन नियुक्त्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2015 11:42 PM2015-11-18T23:42:50+5:302015-11-18T23:43:32+5:30
मनपात एका वारस हक्कावर दोन नियुक्त्या
मालेगाव : येथील महानगरपालिकेत एका वारस हक्कावर दोन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी तसेच अशा वारसदारांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान आढाव यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येथील महानगरपालिकेत सेवानिवृत्त, मयत झालेल्या तसेच स्वेच्छानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर दोन वारसांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. शासनाच्या नियमानुसार तसेच लाड समितीच्या अहवालानुसार एका वारस हक्कावर एकास नियुक्ती करण्याचा नियम आहे. असे असताना येथील अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोडी करून नियमबाह्य पद्धतीने दोन जणांच्या नियुक्त्या केल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात सतरा जणांचे नावे पुराव्यानिशी देण्यात आली आहेत. हे सर्व नियुक्तीच्या ठिकाणी काम करत नाही. यातील काही कर्मचारी मुकादमचे, तर काही स्वच्छता निरीक्षकाचे काम करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नियमबाह्य पद्धतीने या पदांचे वेतन घेत आहे. यामुळे मनपाची फसवणूक केली जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येऊन मनपाच्या आर्थिक नुकसानीची वसुली करण्यात यावी, अशी मागणी आढाव यांनी केली आहे. (प्रतिनिधी)