इथेनॉलच्या वापरामुळे दोन लाख कोटींची बचत
By admin | Published: August 23, 2014 03:04 AM2014-08-23T03:04:31+5:302014-08-23T03:04:31+5:30
पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत इथेनॉलचा खर्चही कमी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलनात बचत होईल.
नागपूर : पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत इथेनॉलचा खर्चही कमी आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विदेशी चलनात बचत होईल. पेट्रोलजन्य पदार्थाच्या आयातीवर वर्षाला सहा लाख कोटी खर्च होतात.
पेट्रोलऐवजी इथेनॉलचा वापर झाला तर दोन लाख कोटींची बचत होईल. पर्यावरण वाद्यांच्या जीवनात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. इथेनॉलमुळे पर्यावरण संवर्धनाला मदत होईल, असा विश्वास केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या देशातील पहिल्या बसचे लोकार्पण शुक्रवारी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. स्कॅनिआ कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅडर्स ग्रंडस्ट्रॉमर यांनी महापौर अनिल सोले यांना ग्रीन बसची चावी सोपविली तर गडकरी यांनी इथेनॉल बसला हिरवी झेंडी दिली. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे संयुक्त सचिव संजय गंगोपाध्याय, अनिल सोले, उपमहापौर जैतुन्नबी अन्सारी, खासदार अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे, माजी आमदार गिरीश गांधी, भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्याम वर्धने , अॅडर्स ग्रंडस्ट्रॉमर ,एमएनआरई च्या संचालिका परविंदर धनेचा आदी उपस्थित होते.
या वेळी गडकरी यांनी स्कॅनिआ कमर्शियल व्हेईकल्स इंडिया प्रा. लि. कंपनीने विदर्भात उद्योग सुरू करावा, असे आवाहन कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅडर्स ग्रंडस्ट्रॉमर यांना केले. यासाठी कंपनीला जमीन व आवश्यक परवानगी सहा महिन्यात उपलब्ध केली जाईल. यातून विदर्भातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तसेच शेतक ऱ्यांनाही याचा लाभ होईल. त्यांच्या जीवनमानात बदल होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
शहर व ग्रामीण भागातील बस वाहतुकीसाठी इथेनॉल व बायोगॅसचा अधिकाधिक वापर करण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असल्याची माहिती संजय गंगोपाध्याय यांनी दिली.
इथेनॉल बस चालविणारी घटना ऐतिहासिक असून हा बहुमान नागपूर महापालिकेला मिळाला. यातून देशात इथेनॉलची क्रांती होईल, असा विश्वास महापौर अनिल सोले यांनी व्यक्त केला.
नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे भूषण आहे. प्रगती बघून दृष्ट लाण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा गिरीश गांधी यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)