दिमाखात धावली ‘कोट मोलाची कार’
By admin | Published: August 23, 2014 03:03 AM2014-08-23T03:03:34+5:302014-08-23T03:03:34+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नागपूर-मौद्यात येण्यापासून तो परत दिल्लीत पोहचण्यापर्यंत सुरक्षा यंत्रणेची धाकधूक कायम होती.
नरेश डोंगरे नागपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नागपूर-मौद्यात येण्यापासून तो परत दिल्लीत पोहचण्यापर्यंत सुरक्षा यंत्रणेची धाकधूक कायम होती. दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम निर्विघ्नपणे आटोपून ते दिल्लीला गेले. त्यांच्यासोबतच त्यांची सुरक्षा वाहनारेही परतले. चर्चेत राहिली ती पंतप्रधानांची वैशिष्ट्यपूर्ण बीएमडब्ल्यू!
होय, देशातील सर्वात सुरक्षित समजली जाणारी ही ‘कोट मोलाची कार’ गुरुवारी पंतप्रधानांना घेऊन नागपुरातील रस्त्यावर दिमाखात दौडली अन् आता चर्चेचा विषय ठरली. पंतप्रधान दौऱ्याच्या बंदोबस्ताच्या दडपणातून मुक्त झालेल्या सुरक्षा अधिका-यांमध्ये या कारची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान मोदी नागपुरातील कार्यक्रमस्थळी कशाने येतील, कोणत्या वाहनात बसतील, कोणत्या वाहनातून परत जातील, याची पूर्वतयारी सुरक्षा यंत्रणेने आधीच करून घेतली होती. पंतप्रधानांना नागपूरच्या विमानतळापासून कस्तुरचंद पार्कपर्यंत नेण्या-आणण्यासाठी दोन जॅमर आणि तीन विशेष वाहने मागवून घेण्यात आली होती. त्यात बीएमडब्ल्यू सेव्हन (७) सिरिजची ‘७६० एलआय सिक्युरिटी एडिशन’ ही अत्याधुनिक आणि अतिसुरक्षित (डीएलसीव्ही ३०००) कारही होती.
खास रेल्वेने ती नागपुरात आली होती. पाच कोटी रुपये किंमत असलेल्या या कारला अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी (बुलेट प्रूफ, फायर प्रूफ बनविण्यासाठी) साडेचार कोटींचा खर्च आल्याचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी सांगत होते. तब्बल तीन दिवस (१९, २० आणि २१ आॅगस्ट) या कारचा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात मुक्काम होता. या कारभोवती २४ तास सशस्त्र सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा होता. २० आॅगस्टच्या दुपारी या कारने रंगीत तालिम (रिहर्सल) केली आणि २१ आॅगस्टला तिने मोठ्या दिमाखात पंतप्रधान मोदी यांना विमानतळावरून केपीत आणले. तेथून विमानतळावर नेले. आपले कर्तव्य पूर्ण झाल्यानंतर मध्यरात्री तीसुद्धा रेल्वेने दिल्लीकडे रवाना झाली.