E दुकानदारी

By Admin | Published: October 28, 2016 04:56 PM2016-10-28T16:56:16+5:302016-10-28T17:21:01+5:30

अमुकच दुकानातून खरेदी करायची आणि प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय वस्तू घ्यायची नाही, हा पारंपरिक फंडा सोडून निमशहरी आणि खेड्यातले ग्राहकही आता ई-दुकानांकडे वळताहेत.

E shopkeeping | E दुकानदारी

E दुकानदारी

googlenewsNext

 - ओंकार करंबेळकर 

अमुकच दुकानातून खरेदी करायची
आणि प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय
वस्तू घ्यायची नाही,
हा पारंपरिक फंडा सोडून
निमशहरी आणि खेड्यातले ग्राहकही 
आता ई-दुकानांकडे वळताहेत.
यंदाच्या आॅनलाइन दिवाळी सेलमध्येही आतापर्यंत 
तब्बल ७० टक्के वाटा 
निमशहरी ग्राहकांचा आहे. 
काही तासांत काही लाख वस्तूंच्या
खरेदीचा विक्रमही याच ग्राहकांचा.
ई-कंपन्यांनीही त्यामुळेच 
आपले लक्ष आता खेड्यापाड्यांतल्या तरुणांच्या हाती आलेल्या 
‘मोबाइल दुकानांकडे’ वळवले आहे.

दसरा, दिवाळी आली की त्या-त्या शहरांतील, गावातील मार्केट ओसंडून वाहू लागतात. खरेदीची धावपळ उडते. दुकानदार आणि तेथील कर्मचाऱ्यांना श्वास घ्यायलाही उसंत मिळत नाही. आजही हे चित्र दिसतेच. पण आधुनिक युगाच्या खांद्यावर स्वार झालेल्या ग्राहकांच्या उड्या आता प्रत्यक्ष दुकांनापेक्षाही आभासी दुकानांवर पडताहेत. त्यातही आश्चर्याची गोष्ट अशी की, शहरी ग्राहकांपेक्षा निमशहरी आणि खेड्यातल्या ग्राहकांनी या अदृश्य बाजारपेठा अक्षरश: गजबजल्या आहेत आणि ई-कॉमर्स कंपन्यांनीही याच ग्राहकांवर आता आपले लक्ष केंद्रित केले आहे.
काय कारण आहे?
खरेदीचे पारंपरिक पर्याय सोडून ग्राहक या नव्या मार्गाकडे का वळताहेत?..
स्नॅपडील असो वा फ्लिपकार्ट, ई-कॉमर्स क्षेत्रातील या आघाडीच्या कंपन्यांनी दसरा आणि दिवाळीच्या आसपास प्रत्येक वर्तमानपत्रात पानभरून जाहिराती दिल्या आणि त्यांच्या वेबसाइट्सवर ग्राहकांचा अक्षरश: पूर आला. मागच्या वर्षी काही कंपन्यांच्या साइट्स चक्क क्रॅश झाल्या होत्या इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात आॅनलाइन शॉपिंग वाढले आहे. यंदाच्या वर्षी या ग्राहकांच्या संख़्येत वाढ झालीच त्याहून त्यांच्यामध्ये मोठा वाटा दुसऱ्या आणि तृतीय श्रेणीतील शहरांचा आणि खेड्यांचा असल्याचे दिसत आहे. इतकेच नव्हे, तर नव्याने आॅनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचीही संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे.
फक्त दिवाळीतच कपडे घ्यायचे किंवा फ्रीज, कलर टीव्हीसाठी वर्ष- दोन वर्षं पैसे साठवून ते सणाच्या आसपास घेण्याचे मध्यमवर्गीयांचे दिवस कधीच संपले आहेत. किंवा त्यासाठी बोनसची वाट पाहणे वगैरे संकल्पनाही फारशा महत्त्वाच्या उरलेल्या नाहीत. कारण मध्यमवर्गीयांच्या आणि नवश्रीमंत वर्गाच्या वाढत्या संख्येबरोबर ग्राहकांच्या नव्या लाटेचाही उदय झाला आहे. आर्थिक वृद्धीबरोबर त्यांची खरेदी करण्याची ताकद आणि खरेदीच्या संकल्पनांमध्ये आमूलाग्र म्हणावा इतका बदल झालेला आहे. कपडे, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू पिढ्यान्पिढ्या ठरावीक दुकानातून घेण्याचे दिवस मागे पडले असल्याने मध्यमवर्गीय वर्षभर भरपूर खरेदी करू शकतात आणि करतातही. त्यामुळेच आॅनलाइन शॉपिंगसारखा पर्याय त्यांच्या पसंतीस उतरला आहे. भरपूर व्हरायटी, दुकानांपेक्षा मिळणारी थेट सूट आणि घरबसल्या मिळणाऱ्या वस्तू यामुळे जुन्या खरेदीला रामराम करून आॅनलाइन शॉपिंगला भारतीय ग्राहकांनी उचलून धरले आहे.
अ‍ॅमेझॉन कंपनीच्या माहितीनुसार गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी ग्राहकांच्या संख्येत काही पटींनी वाढ झाली आहे. त्यातील ७० टक्के ग्राहक हे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीत येणाऱ्या शहरांमधील आहेत, तर फ्लिपकार्टच्या याच श्रेणीतील ग्राहकांनी मागच्या वर्षीपासून ३४ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत उडी घेतली आहे. एवढ्या माहितीवरूनच 

यावर्षी आॅनलाइन खरेदीचा वाढलेला आवाका दिसून येतो. स्नॅपडीलने जाहीर केलेली माहिती त्याहून विचारात पाडणारी आहे आणि बदलत्या खरेदी प्रवाहाकडे लक्ष वेधणारी आहे. स्नॅपडीलने लावलेल्या दिवाळी सेलमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकांच्या मागण्यांमध्ये २० पटींनी वाढ झाली आहे. बहुतांश वेळा दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबादसारखी शहरेच आॅनलाइन खरेदीमध्ये अग्रेसर असतील असे वाटते, पण लहान शहरे आणि ईशान्येकडील राज्ये खरेदीमध्ये पुढे पुढे जात आहेत. 
स्नॅपडीलच्या माहितीनुसार दिवाळीमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या उत्पादनांना मिझोरम, मेघालय, गोवा, हिमाचल प्रदेशातील ग्राहकांनी वाढती पसंती दिली आहे. २ आॅक्टोबर रोजी फ्लिपकार्टच्या द बिग बिलियन डेजने विक्रीचा विक्रम केला. या एकाच दिवशी एका तासात पाच लाखांहून अधिक उत्पादनांची विक्री झाली. त्यातील चाळीस टक्के ग्राहकांनी गृहोपयोगी वस्तूंसाठी मागणी नोंदवली. फ्लिपकार्ट आणि मयंत्रा या दोन्ही कंपन्यांनी साडेबावीस लाख वस्तूंची विक्री सेलच्या पहिल्याच दिवशी केवळ बारा तासांमध्ये केली. मागील वर्षी अशा सेलचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांनी आपल्याला यावेळेस हव्या असणाऱ्या वस्तूंचा विचार आधीच करून ठेवला होता, तर मागच्या वर्षी संधी हुकलेल्या ग्राहकांनी यावेळेस जाहिराती वाचून वेळेमध्ये आपल्या मागण्या नोंदविल्या. 
आॅनलाइन खरेदीमध्ये आपल्याला भरपूर वेळ असताना आपल्या कार्टमध्ये किंवा बास्केटमध्ये हव्या असलेल्या वस्तू भरून ठेवता येतात आणि हव्या त्यावेळेस खरेदी करता येतात. अनेक ग्राहकांनी आपापली अशी काटर््स वस्तूंनी आधीच भरून ठेवली होती आणि सेल सुरू होताच त्याची मागणी नोंदविली. त्यामुळे सेल सुरू झाल्यावर वस्तू पारखण्यात वेळ घालवून ग्राहकांच्या पुरात अडकण्याऐवजी त्यांनी सुरक्षित खरेदीचा मार्ग आधीच आखून ठेवला होता. एका ग्राहकाने दुसऱ्यास वस्तूची आणि ती मिळविण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याची ही पद्धतीही भारतासाठी नवी आहे. या खरेदीबाबत नव्या ग्राहकांना फारसे शिकवत वगैरे बसावे लागत नाही. जुन्या ग्राहकांनी नव्या ग्राहकांना तंत्रज्ञान वापरायची पद्धती एकदा सांगितली की काम होते. लोक सफाईदारपणे त्याचा वापर करू लागतात. या दसऱ्याच्या आणि दिवाळीच्या सेलमध्ये मोबाइल फोनची झालेली विक्रमी विक्री त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल.
गेल्या पाच वर्षांमध्ये भारतामध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. साधे फोन जाऊन स्मार्टफोन आल्यामुळे मोबाइलमध्ये इंटरनेट वापरण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येकाच्या हातात फोन आणि व्हॉट्सअ‍ॅप असे समीकरणच आहे. तुमचा मोबाइल नंबर द्या असे विचारण्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर आहात का असे विचारले जाते. भारतातील मोबाइल ग्राहक फोनचा वापर व्हॉट्सअ‍ॅपसह आॅनलाइन शॉपिंगसाठीही जास्त करत असल्याचे निदर्शनास आले आहे. आॅनलाइन खरेदीमध्येही संगणकाऐवजी फोनद्वारे मागणी नोंदविण्यास प्राधान्य दिले जात आहे. म्हणजेच या प्रकारच्या खरेदीमध्येही अंतर्गत बदल झपाट्याने होत आहेत. एका सर्वेक्षणानुसार सुमारे ४० टक्के ग्राहक आपली मागणी फोनद्वारे नोंदवू लागले आहेत.
एकेकाळी एखादी वस्तू बराच विचार करून, वस्तू हातामध्ये घेऊन त्याची पारख केल्याशिवाय न घेणारे ग्राहक टीव्हीवर टेलिशॉपिंगच्या कार्यक्रमातील नंबरवर फोन फिरवून किंवा स्मार्टफोनवरून सहज आॅर्डर करू लागले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील आणि लहान शहरातील ग्राहक वेगाने पुढे पुढे कूच करू लागले आहेत. सण-समारंभ हे भारतीयांसाठी गृहोपयोगी वस्तू म्हणजे होम अप्लायन्सेस खरेदी करण्याची वेळ असते. त्यामुळेच सौंदर्यप्रसाधने, मोबाइल यांच्याबरोबर टीव्ही, फ्रीज, मिक्सर, वातानुकूलन यंत्रणा याकडे ग्राहकांचा ओढा वळलेला दिसून येतो.
गेल्या वर्षी याच सणाासुदीच्या हंगामामध्ये ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये २०,००० कोटींची उलाढाल झाली होती, ती वाढून यावर्षी २५,००० कोटींवर जाण्याची शक्यता असोचेमने वतर्विली आहे. यावर्षीचा सणासुदीचा हंगाम ई-कॉमर्स कंपन्यांसाठी व्यस्त आणि मोठा असून, भारतीय ग्राहक त्यामध्ये २५,००० कोटी खर्च करतील असे असोचेमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी असोचेमच्या अहवालावर बोलताना सांगितले. असोचेमने हे सर्वेक्षण २५०० नोकरदारांकडून मिळवलेल्या माहितीवर केले आहे. त्यातील ६० टक्के लोकांनी आॅनलाइन शॉपिंगच करणार असल्याचे असोचेमला सांगितले. हे नोकरदार लोक बँकिंग, आर्थिक सेवा आणि विमा क्षेत्रात काम करणारे असून, त्यांचा वयोगट २५ ते ४० मध्ये होता. 
अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानीचा प्रदेश, लखनौ, मुंबई, कोलकाता, जयपूर, इंदूर आणि हैदराबाद अशा देशातील विविध कोपऱ्यांमधील शहरांचा या सर्वेक्षणात समावेश केल्यामुळे ग्राहकांच्या आॅनलाइन खरेदीबाबतचा खरा विचार समोर आला. खरेदी करण्याची सोपी पद्धती, पैसे देण्याचे विविध मार्ग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या आकर्षक आॅफर्स हे यामागचे मुख्य कारण असल्याचे या सर्वेक्षणातून पुन्हा अधोरेखित झाले. मात्र असे असले तरी तज्ज्ञांनी या ग्राहकांच्या पुराचा अंदाज घेऊन कंपन्यांना काम करण्याचा सल्ला दिला. ग्राहकांच्या मागण्यांमुळे तुमची संकेतस्थळे बंद पडू नयेत त्याचप्रमाणे नोंदवलेल्या मागणीची वस्तू वेळेत, योग्य जागेवर पोहोचवण्याच्या जबाबदारीकडे कंपन्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे स्पष्ट मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. कारण संकेतस्थळ क्रॅश होण्याने भविष्यात ग्राहकांना गमावल्यासारखेच होईल, अशी भीती या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 
दिवाळी-दसऱ्याच्या हंगामाने भारतीय ई- कॉमर्स क्षेत्रातील नव्या विकासाबाबत मोठे भाकीतच केले आहे. ईशान्य भारतातील ज्या राज्यांना एरवी अशा बाबतीत गृहीत धरलेले नसते त्यांनीही सर्वांना धक्का दिला आहे. वाढता इंटरनेटचा वापर कदाचित या संख्येत आता भरच घालत जाईल आणि पुढच्या वर्षी या वर्षातील खरेदीचा विक्रम मोडून आपण नक्कीच पुढे गेलेलो असू असे या आकडेवारीवरून वाटते.
प्रत्यक्ष दुकानांतून वस्तू विकणाऱ्या दुकानदारांनी आधीच ई-दुकानदारांची धास्ती घेतली आहे. शहरी भागात हे चित्र दिसतेच. त्यामुळे या दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे पर्याय चाचपायला सुरुवात केली आहे. आता निमशहरी आणि ग्रामीण ग्राहकही ई-दुकानदारांकडे वळतोय म्हटल्यावर भारतीय पारंपरिक बाजारपेठांना मुळातून हादरे बसायला सुरुवात झाली आहे. नव्या युगाशी जुळवून घेण्यातच साऱ्यांचे हित आहे, हेच या वाटचालीतून अधोरेखित होत आहे..

दहा हजार खेड्यांत आॅफलाइन स्टोअर्स!
मोबाइल वापरणाऱ्यांची आणि इंटरनेटची उपलब्धता असणाऱ्या लोकांची संख्या भारतात वेगाने वाढत असली, तरी ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनला धडपड करावीच लागत आहे. पारंपरिक विचारांच्या ग्राहकांना प्रत्येक वस्तू खरेदी करताना ती हाताळून किंवा ती चालते कशी हे पाहिल्याशिवाय समाधान होत नाही. विशेषत: टीव्ही, फोनसारख्या वस्तू किंवा वॉशिंग मशीन वगैरे वस्तूंचे डेमो पाहिल्याशिवाय, इतर उत्पादनांची तुलना केल्याशिवाय त्यांना खरेदी करता येत नाही. अशा ग्राहकांना आपल्या कंपनीकडे वळविण्यासाठी आणि ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी फ्लिपकार्ट आता आॅफलाइन स्टोअर्सही सुरू करत आहे. त्यामुळे या प्रकारच्या ग्राहकांना तेथे जाऊन हव्या त्या वस्तू हाताळून, वापर करून मग खरेदी करता येणार आहेत. यामध्ये अ‍ॅमेझॉनने आधीच स्टोअरकिंग कंपनीशी करार करून भारतातील दहा हजार खेड्यांमध्ये स्टोअर्स उभी केली आहेत. यामध्ये गावातल्या एखाद्या कोपऱ्यावर किंवा महत्त्वाच्या दुकानात वस्तू मांडून त्यांची माहिती पुरविण्याची सोय केलेली असते. गावातील लोक तेथे जाऊन वस्तूची माहिती मिळवू शकतात. इंग्रजी भाषा हादेखील आॅनलाइन खरेदीसाठी महत्त्वाचा टप्पा असतो. सर्व व्यवहार इंग्रजीमध्ये होत असल्यामुळेही नवे ग्राहक जोडण्यामध्ये थोडा अडथळा येतो. पण स्टोअरकिंगच्या या आॅफलाइन स्टोअरमध्ये तुमच्या स्थानिक भाषेमध्ये माहिती देण्याची सोय केलेली असते. त्यामुळे पारंपरिक विचारांच्या ग्राहकांना योग्य ती माहिती मिळते.

Web Title: E shopkeeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.