सामाजिक अभिसरण!

By Admin | Published: July 26, 2015 02:46 AM2015-07-26T02:46:39+5:302015-07-26T02:46:39+5:30

महाराष्ट्राची माय माउली ज्ञानोबा अन् जगद्गुरू तुकोबा यांच्या प्रभावळीतील संत चळवळीला लाभलेले समतावादी फळ म्हणजे आषाढी-कार्तिकी पंढरीची वारी होय.

Social convergence! | सामाजिक अभिसरण!

सामाजिक अभिसरण!

googlenewsNext

- प्रा. शिवाजीराव भुकेले

महाराष्ट्राची माय माउली ज्ञानोबा अन् जगद्गुरू तुकोबा यांच्या प्रभावळीतील संत चळवळीला लाभलेले समतावादी फळ म्हणजे आषाढी-कार्तिकी पंढरीची वारी होय. संत हे चिंंतनाचे प्रवासी आणि द्रष्टे होते. त्यामुळे त्यांनी वारीच्या वाटेवर निर्माण केलेली समता, ममता व एकता मध्ययुगीन कालखंडात जेवढी उपयुक्त व गरजेची होती, तेवढीच आजही गरजेची आहे.

जातिभेदविरहित समाजरचना, स्त्री-पुरुष समता, अहंकाराचे विसर्जन, चारित्र्यबल आदी चिरंतन व दीर्घायू जीवनमूल्यांचा उद्घोष संतांनी वारीच्या वाटेवर तर केलाच, पण त्याबरोबरच गावगाड्यात जातीपातीच्या मगरमिठीत अडकून बसलेल्या, आर्थिक विषमतेच्या चिखलात गळाभर रुतून बसलेल्या दरिद्री नारायणांच्यासाठीसुद्धा हा उद्घोष केला. एवढेच नव्हे, तर आधुनिक भारतीय समाजरचनेत सामाजिक अभिसरणासाठी ज्या सात्त्विक मूल्यांच्या शिदोरीची गरज होती, ती वारीच्या वाटेवर ज्ञानोबा-तुकोबांच्या सवंगड्यांनी मुक्तहस्ते वाटली व आजही वाटीत आहेत. संत ज्ञानेश्वरांनी
जे-जे भेटे भूत। ते-ते मानिजे भगवंत।
हा भक्तियोग निश्चित। जाण माझा॥
अशा ओव्यांच्याद्वारा सर्वांभूती ईश्वरानुभूति देणारा सर्वात्मवाद अथवा एकतेची जी शिकवण दिली, तिचे पालन वारीच्या वाटेवर तनु, मनु, जिवे करणारे शेकडो वारकरी आहेत. आपल्या विठ्ठलाच्या सावळ्या रूपाला ते
विठ्ठल जळी स्थळी भरला। रिता ठाव नाही उरला।
आज मी दृृष्टीने देखिला। विठ्ठलची-विठ्ठलची॥
या आंतरिक भावनेने पाहतात. त्यामुळे झाडेमाडे, गुरेढोरे, पशुपक्षी या साऱ्यांच्यात जर विठ्ठल दिसू लागला, तर जातीपातीची व अन्य विषमतेची लौकिक बंधने आपोआपच गळून पडतात. वारी जातिधर्मावर नव्हे, तर जगण्यावर प्रेम करायला शिकविते. हा वारकऱ्यांचा ‘प्रेमयोग’ बहुजनांच्या जगण्याच्या आशा पल्लवित करणारा योग मानावा लागेल. आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी परंपरेच्या कुबड्या लागत नाहीत, तर बंडखोरीचा पीळ असावा लागतो हा धगधगीत विचार तुकोबांनी वारकऱ्यांना दिला. त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की -
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन।
हेचि आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम॥
वारीच्या वाटेवर भेटणारी जात म्हणजे कुठल्याही लाभावाचून व लोभावाचून समाजावर निरपेक्ष भावनेने प्रेम करणारी वैष्णवांची जात होय. आषाढी वारी वारकऱ्यांच्या एकात्म भावनेची पावन गंगोत्री आहे. खरे पाहता अनेक देशांत ‘वर्ग’ व्यवस्था आहे, तर आपण ‘वर्णा’च्या उतरंडीत अडकलो आहोत. या उतरंडीतील तळाचे मडके गोरोबाकाका, नामदेव, जनाबाई, चोखोबा, तुकोबा, कर्ममेळा आदी संतांना या उतरंडवादी व्यवस्थेचा एवढा त्रास सहन करावा लागला, की चोखोबांनी आर्तरवाने सांगितले, ‘कोण तो सोवळा, कोण तो ओवळा। दोन्हीच्या वेगळा विठ्ठल माझा।’ नामदेवास सांगावे लागले, ‘शिंंपियाच्या कुळी जन्म मज झाला, परी हेतू गुंतला सदाशिवी।’ एवढेच नव्हे, तर उच्च कुळात जन्म होऊनही उपेक्षेचे चटके सहन करणाऱ्या संत ज्ञानदेवांनी ‘कूळ जाती वर्ण। अवघेची गा अकारण।’ या समतावादाचा उद्घोष केला. खरेतर, हे काम तत्कालीन शास्त्रीपंडितांचे होते, परंतु संत परंपरेतील धर्म बहिष्कृतांनी हे काम पुढे नेले.
या सर्व संतांच्या प्रयत्नातून एक गोष्ट सिद्ध होते की, महाराष्ट्रात उदय पावलेल्या संत चळवळीने निदान धार्मिक क्षेत्रापुरती तरी जातीपातीची बंधने नाकारून सामाजिक अभिसरणाच्या चळवळीस आरंभ केला. वर्ण व्यवस्थेमुळे ज्या समाजाला ‘जडत्व’ प्राप्त झाले होते, समाजातील ‘नाहीरे’ वर्गाचा जगण्याचा अधिकारच ज्याने नाकारला होता, ते वर्ण वर्चस्वाचे ‘जू’ झुगारून देऊन ज्ञानोबा, तुकोबांनी पंढरीची पताका खांद्यावर घेतली आणि -
वर्ण अभिमान विसरली याती
एकमेका लोटांगणी जाती रे।
हा समतेचा उद्घोष केला. वारकरी संप्रदायाच्या सर्वसमावेशक विचारात ‘स्त्री’ला केवळ शक्तीचे स्थान दिले नाही, तर तिला पुरुषाचा एक कर्तृत्ववान सहकारी मानण्यात आले. एवढेच नव्हे, तर ती प्रेरणाशक्ती ठरली. चंद्रमोळी झोपडीत डोळे बंद करून बसलेल्या ज्ञानदेवांना मुक्ताईने
‘‘योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा
चिंंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥’’
हा प्रेरणात्मक संदेश दिला. जेव्हा व्यवस्थेने जनाईचा ईश्वरभक्तीचा अधिकार नाकारला, तेव्हा जनाई नावाची वीज कडाडली,
डोईचा पदर आला खांद्यावरी
भरल्या बाजारी जाईन मी।
अगदी तुमच्या-माझ्या बापजाद्यांच्या वेळची बहिणाबाई चौधरी साम्यरसतेचा अभिषेक करताना व स्वत:ला सरस्वती कन्या संबोधताना म्हणते,
माझी माय सरस्वती, मला शिकविते बोली।
लेक बहिणाईच्या मनी, किती गुपित पेरली।
थोडक्यात, मध्यकालीन संत चळवळीने सलग ७०० वर्षे तरी समाजजीवनावर आलेली कुविचारांची जळमटे नाहीशी करण्याचे काम ‘वारी’सारख्या सुलभ साधनांनी केले.

Web Title: Social convergence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.