पंचगंगा उगम रूपात अंबाबाई...
By Admin | Published: September 28, 2014 06:02 PM2014-09-28T18:02:38+5:302014-09-28T18:02:38+5:30
गंगा, सरस्वती, भद्रा, शिवा आणि कुंभी या पाच नद्यांच्या संगमाने निर्माण झालेल्या पंचगंगा उगम रूपात नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (रविवारी) करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा बांधण्यात आली.
- दिवसभरात तीन लाख भाविकांनी घेतले देवीचे दर्शन
- कोल्हापूर हाऊसफुल्ल
कोल्हापूर : करवीर क्षेत्राची जीवनदायिनी म्हणजे पंचगंगा नदी... सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाने करवीर नगरी महायज्ञ केला. त्यासाठी या क्षेत्री साक्षात गंगा, सरस्वती, भद्रा, शिवा आणि कुंभी या पाच नद्यांच्या संगमाने निर्माण झालेल्या पंचगंगा उगम रूपात नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला (रविवारी) करवीर निवासिनी अंबाबाईची पूजा बांधण्यात आली. सुट्टीचा दिवस असल्याने आज दिवसभरात तीन लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्श़न घेतले. यामुळे अवघ्या कोल्हापूरला जत्रेचे स्वरूप ्आले आहे.
शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या दिवशी दुपारच्या आरतीनंतर ही पूजा बांधण्यात आली. ब्रह्मदेवांना करवीर नगरी महायज्ञ करायचा होता. त्याच्या पूर्ततेसाठी अवभृत स्नान करणे आवश्यक होते. तसे महान तीर्थ या क्षेत्री असावे, म्हणून वसिष्ठ ऋषींनी सरस्वती, विश्वामित्रांनी भोगावती, कश्यपांनी तुळशी, गालवांनी भद्रा, गर्गांनी कुंभी अशा पाच नद्या बोलावल्या. त्या पंचनदीकांपैकी भोगावती-साक्षात गंगा, सरस्वती, भद्रा म्हणजे विष्णू, शिवा म्हणजे शंकर, कुंभी म्हणजे ब्रह्मा आहेत. हे पाचही देवता पंचगंगा नावाने ओळखल्या जातात. हातात वरद कमळ आणि कुंभ धारण करणारी ही गंगा अशेष पापहारिणी म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ शुद्ध दशमीला या पंचगंगेचा प्रकटदिन उत्सव केला जावा, असा करवीर महात्म्यात उल्लेख आहे.
ही पूजा श्रीपूजक सागर मुनीश्वर, रवी माईनकर यांनी बांधली. पूजेची संकल्पना उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर यांची असून, मूर्ती सर्जेराव निगवेकर व प्रशांत इंचनाळकर यांनी साकारल्या आहेत.