व्यवसायिक वादातून एकाचा खून
By Admin | Published: July 30, 2014 10:33 PM2014-07-30T22:33:48+5:302014-07-31T01:24:24+5:30
अकोला तालुक्यातील घटना: एकाची प्रकृती गंभीर, तीन आरोपी ताब्यात.
अकोला: पूर्ववैमनस्यातून तीन आरोपींनी एका पानपट्टी व्यवसायिकासह दोघांवर कुर्हाड आणि गुप्तीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अकोलानजिकच्या घुसर येथे घडली. जखमींपैकी एकाचा रूग्णालयात नेताना मृत्यू झाला तर दुसर्या युवकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घुसर येथील गोपाल भाऊराव ठाकरे(३२) हे घुसर येथील बसथांब्यानजिक पानपट्टी चालवतात. त्यांच्या पानपट्टीसमोर गजानन जनार्दन पागृत (३२) यांचीसुद्धा पानपट्टी आहे. दोघांमध्ये व्यवसायिक कारणावरून दोन वर्षांपासून वाद सुरू आहेत. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोपाल ठाकरे यांनी पानपट्टी उघडली. त्याचवेळी आरोपी गाजानन पागृत, त्याचा मोठा भाऊ संतोष जनार्दन पागृत(३८) आणि त्याचा भाचा दीपक भांबेरे (१८) हे कुर्हाड व गुप्ती घेवून आले. त्यांनी गोपालसोबत वाद घातला आणि काही कळण्याच्या आतच तिघांनी गोपालवर कुर्हाड व गुप्तीने हल्ला चढविला. त्याचे डोक्यावर आणि पोटावर कुर्हाडीने तसेच गुप्तीने वार केले. गोपालच्या पानपट्टीपासून काही अंतरावरच त्याचे काका भानुदास श्यामराव ठाकरे (४0) यांचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. त्यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. यात हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालयात हलविले जात असताना, भानुदास ठाकरे यांचा वाटेतच मृत्यू झाला. गोपालची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
*मित्र बनले एकमेकांचे वैरी
गावकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाल ठाकरे व गजानन पागृत यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. दोघांनी मिळून घुसर बसथांब्यावर पानपट्टीचा व्यवसाय सुरू केला. परंतू काही वर्षातच त्यांच्यात खटके उडू लागले. त्यानंतर गोपाल याने स्वत:ची वेगळी पानपट्टी सुरू केली. त्यामुळे गजाननच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आणि दोघेही एकमेकांचा द्वेष करू लागले. या द्वेषाची परिणती बुधवारी हत्याकांडात झाली.