संचमान्यतेमुळे रात्रशाळांतील शिक्षक बेरोजगार
By admin | Published: May 30, 2016 03:51 AM2016-05-30T03:51:18+5:302016-05-30T03:51:18+5:30
रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली
मुंबई : मुंबईसह राज्यातील रात्रशाळांसाठी २८ आॅगस्ट २०१५च्या निकषानुसारच संचमान्यता होत असल्याने अनेक शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासन निर्णयातील उल्लेखाप्रमाणे रात्रशाळांसाठी वेगळे निकष लावण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.
शासन निर्णयामध्ये उल्लेख असतानाही रात्रशाळांत जुन्या निकषांनुसार संचमान्यता होत असल्याची माहिती शिक्षक परिषदेने दिली आहे. शिक्षक आमदार रामनाथ मोते म्हणाले की, जुन्या संचमान्यतेच्या निकषांमुळे अनेक रात्रशाळांतील शिक्षकांना नोकरी गमवावी लागत आहे. तरी रात्रशाळांची संचमान्यता करताना शासनाने जाहीर केलेले वेगळे निकष लावण्याची गरज मोते यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.
मुंबईसह राज्यात १७६ रात्रशाळा आहेत. त्यांत शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. मात्र या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अर्धवेळ समजले जाते. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ शिक्षकाच्या वेतनश्रेणीच्या निम्मी वेतनश्रेणी दिली जाते. बहुतेक रात्रशाळांतील अनेक शिक्षक हे फक्त संबंधित रात्रशाळेतच काम करीत आहेत. परिणामी, संचमान्यतेच्या जाचक निकषांमुळे अशा अनेक अर्धवेळ शिक्षकांना नोकरी गमावून घरी बसावे लागेल, असा आरोप शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
>विद्यार्थ्यांचेही नुकसान
२० नोव्हेंबर २०१३च्या शासन निर्णयात रात्रशाळांच्या संचमान्यतेबाबत वेगळे निकष लवकरच जाहीर केले जातील, असा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र दोन वर्षे उलटली तरी याबाबत वेगळे निकष जाहीर झालेले नाहीत. उलट शिक्षणाधिकारी २८ आॅगस्ट २०१५च्या नियमित शाळांच्या निकषानुसार रात्रशाळांची संचमान्यता करीत आहेत.
त्यामुळे अनेक शिक्षकांना नोकरी गमवावी लागेलच, मात्र शाळा बंद झाल्यास विद्यार्थीही शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची भीती शिक्षक परिषदेने व्यक्त केली आहे. म्हणूनच शिक्षण विभागाने रात्रशाळांचे निकष जाहीर होत नाही, तोपर्यंत रात्रशाळांची संचमान्यता करू नये, अशी मागणीही शिक्षक परिषदेने केली आहे.