डावे, उजवे आणि मधले!

By admin | Published: August 30, 2015 02:02 AM2015-08-30T02:02:54+5:302015-08-30T02:02:54+5:30

गेला बाजार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून प्रबोधनाची उच्च परंपरा वगैरे लाभलेल्या महाराष्ट्रात केवढी वैचारिक घुसळण झाली! चखलंब्यापासून पुणतांब्यापर्यंत आणि पुण्यनगरीपासून

Left, right and middle! | डावे, उजवे आणि मधले!

डावे, उजवे आणि मधले!

Next

(तिसरी बाजू)

-  नंदकिशोर पाटील 

(लेखक हे लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत.)

गेला बाजार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून प्रबोधनाची उच्च परंपरा वगैरे लाभलेल्या महाराष्ट्रात केवढी वैचारिक घुसळण झाली! चखलंब्यापासून पुणतांब्यापर्यंत आणि पुण्यनगरीपासून महानगरांपर्यंत घोळक्याघोळक्यांनी बौद्धिक रुदन झालं. डावे-उजवे, आतले-बाहेरचे, पुरोगामी-प्रतिगामी, उर्ध्वगामी आणि अर्ध्वगामी अशा साऱ्यांनी कुंभपर्वातील या मांदियाळीत डुबकी मारून अभिव्यक्तीचे पुण्य पदरी पाडून घेतले. काहींनी आपली इयत्ता पाजळत ऐपतीनुसार या वणव्यात जातीय वंगण ओतून विषय धडधडत राहील याची पुरती काळजी घेतली. वादाचा विषयच मुळी अत्यंतिक ज्वलनशील असल्याने पोळी भाजण्यासाठी चालून आलेली संधी कोणी दवडली नाही, हे बरीक बरे झाले. जर ती दवडली गेली असती तर तो करंटेपणाच ठरला असता. पण तेवढी सावधानता आणि समयसूचकता आपल्या अंगी असतेच असते! त्यामुळे काय की हल्ली कोणताच वाद वाया जात नाही. खरं म्हणजे वादीविरुद्ध प्रतिवादी असा सरळ सामना असताना त्यात महाजनवादी, बहुजनवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, समाजवादी... असे सगळे इझमवादी घुसल्याने वादाचा पुरता इस्कोट झाला. पण बुद्धिभेदाचे आणखी एक रिंगण पूर्ण झाले, हेही नसे थोडके.
बळवंत ऊर्फ बाळासाहेब पुरंदरे यांना शासनाने पुरस्कृत करावे की करू नये, यावरून समस्त मराठी जणांत उभे तट पडावेत, हा गनिमी कावा ज्यांनी कोणी आखला असेल त्यांच्या सवाईपणाला कुर्निसातच केला पाहिजे. कावेबाज आणि छावेबाज यांच्यात प्रासादिक लढाईला जुंपून, दोहोंपैकी कोणीही जिंकले तरी आपला झेंडा शाबूत ठेवण्याची खेळी काही औरच म्हटली पाहिजे. अशा कलागतींसाठी अंगी वेगळे कौशल्य असावे लागते. काहींना ही कला उपजतच अवगत असते. पण अशा खेळाचे डावपेच माहिती नसल्याने फसगत होते ती आपली. त्यांचे झेंडे उभेच.
या वादात एक नवी समता आणि समरसताही दिसून आली. एरवी ऊठसूठ ब्राह्मणांवर तोंडसुख घेणारे पळीभर पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी धडपडताना दिसले, तर काही जण छावणीच्या चिंतेमुळे तापून गेले होते. खरं तर असा ऐतिहासिक ऐवज आणि सावज हाती घावल्यानंतर अस्मितांचे भाले-बरचे, लेखण्या परजणारच. विषयाची खोली लक्षात घेता, उत्खननाला भरपूर वाव. त्यामुळं ज्याच्या हाती कुदळ, तो संशोधक बनून जमेल तेवढं खणून गेला. मोजायचं कोणालाच नव्हतं, फक्त खड्डा खोदण्याशी मतलब. साहित्यिकांचं बरं असतं. एकमेकांना ते चांगलं जोखून असतात. कोणी कितीही ‘पॉप्युलर’ असले तरी दुसऱ्यांना ते कद्यपि ‘मौज’त नाहीत! ‘पानिपत’कारांना नेमाडे साहित्यातील दशहतवादी वाटतात, तर नेमाडेबुवांच्या लेखी खांडेकर, अत्रे, करंदीकर साहित्यिक नसतात. जुने हिशेब कोणी कुठेही चुकते करतं!
एक बरं झालं. चॅनेल्स नि वर्तमानपत्रांमधून काही दिवस तरी त्याच त्या रटाळ बातम्यांऐवजी ऐतिहासिक, सामाजिक, वर्गीय अशा विषयांवर ‘बखर’दार चर्चा झडल्या. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या सोशल मीडियावर आपापल्या वकुबानुसार प्रत्येकांनी थॉट्स शेअरिंग केलं. त्यातही बरचसं फॉरवर्डेड, तरी स्वत:चं म्हणून खपवलेलं. विचारतंय कोण? कल्ला होण्याशी मतलब! पण या वादात जे कोणत्याच बाजूचे नव्हते, धड इकडचे ना तिकडचे, त्यांचं काय? प्रश्न वेडगळ असला तरी उच्चारायला हवा. कारण टीआरपीच्या जमान्यात तुम्हाला मत नसून कसं चालेल? डावं असो की उजवं, पण मत हवं! काठावर राहाल तर गुदमरून जाल. मधल्यांचा नेहमीच कोंडमारा होतो. रस्त्यांवरून चालताना अपघात होऊ नये, म्हणून डावीकडून चालायचं आणि घड्याळाचे काटे डावीकडून उजवीकडे फिरतात म्हणून उजवा विचार करायचा, अशी कसरत आपण करतोच ना; मग झालं तर! कालचक्र उजवीकडं झुलकलं असेल तर सरळमार्गी राहून कसं चालेल? ‘डावखुऱ्यांनीच घडविला इतिहास’ असला मजकूर वाचून डावीकडे झुकाल तर कपाळमोक्ष करून घ्याल. बाकी, ग्लोबल वॉर्मिंगमुळं गरमी आणि गुर्मी कधी वाढेल याचा नेम नाही. तेव्हा तुम्ही पंख्याखाली बसलं पाहिजे!


ता. क.
गेले काही दिवस कसे मंतरलेले होते. विद्वजणांची चर्चा, वाद-प्रतिवाद असं सगळं बौद्धिक मंथन सुरू असताना मध्येच नापिकी आणि कर्जबाजारीमुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लोक अन्नपाण्याविना नव्हे, तर वैचारिक उणेपण आले की मरतात, हा सिद्धान्त आहे. त्यामुळे सुज्ञांनी त्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष केलं, ते बरंच झालं म्हणायचं !

Web Title: Left, right and middle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.