बाळासाहेब असते तर त्यांनी भाजपला लाथाडले असते - राज ठाकरे
By admin | Published: September 28, 2014 08:27 PM2014-09-28T20:27:01+5:302014-09-28T21:23:59+5:30
राज्यातील युती तुटल्यावर शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शिवसेनेचा अपमान करणा-या भाजपला लाथाडले असते असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - राज्यातील युती तुटल्यावर शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी शिवसेनेचा अपमान करणा-या भाजपला लाथाडले असते अशा शब्दांत मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. भाजपा हा बेभरवशाचा पक्ष असून मनसेचा नेता पळवताना तुम्हाला लाज का नाही वाटली असेही त्यांनी म्हटले आहे.
रविवारी कांदिवली येथे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पहिल्याच सभेत राज ठाकरेंनी युती व आघाडीवर जोरदार टीका केली. सध्या प्रत्येकजण पक्षांतर करत असून राजकारणाचा बाजार मांडला आहे असे सांगत राज ठाकरेंनी बंडखोरांची खिल्ली उडवली. राज ठाकरे म्हणाले, मी आजारी असलो तरी घरात बसून राज्यातील तमाशाकडे बघत होतो. २५ वर्ष जुनी युती तुटली. पण शिवसेनेने भाजपसमोर लाचारी दाखवली. भाजपा हा वाळवीसारखा कोप-याने खणत जाणारा पक्ष आहे. शिवसेनेच्याऐवजी मी असतो तर कधीच भाजपला लाथाडले असते. भाजपने शिवसेनेचा अपमान केला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांनीही भाजपला लाथाडलेच असते असे राज ठाकरेंनी नमूद केले.
राज्यात युती तुटली तरी इन्कम सोर्स सुरु ठेवण्यासाठी महापालिकांमधील शिवसेना - भाजपची युती कायम आहे. केंद्रातील मंत्रिपदाचाही शिवसेनेने राजीनामा दिलेला नाही याकडेही राज ठाकरेंनी लक्ष वेधले. जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेने रामदास आठवलेंना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देणे हे हास्यास्पदच आहे असे सांगत ठाकरेंनी आठवलेंवरही निशाणा साधला. या सर्व राजकीय गोंधळात यंदाच्या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नाही तर राज्य १५ वर्ष मागे जाईल अशी भितीही राज ठाकरेंनी वर्तवली. जनतेने यंदा मनसेच्या हातात संधी दिल्यास स्वाभिमान काय असतो हे दाखवून देईन, महाराष्ट्राला स्वायत्तता मिळायला हवी, महाराष्ट्र सक्षम असून त्याला केंद्र सरकारची गरज नाही असा पुनरुच्चारही राज ठाकरेंनी केला.
मनसेची ब्ल्यू प्रिंट म्हणजे वचन
मनसेची ब्ल्यू प्रिंट हे म्हणजे ते वचन आहे. राज्यात वीज, पाणी देऊ नाही तर ते देणारच हे माझे वचन आहे. यासाठी आमच्याकडे आराखडेही तयार आहेत असे राज ठाकरेंनी सांगितले. राज्यात मनसेची सत्ता आल्यास परप्रांतातून येणा-यांवर करडी नजर ठेऊ, बजबजपूरी थांबवू, सर्वसामान्यांना स्वस्तात घरं उपलब्ध करुन देऊ, सत्ता आल्यावर मनसेचा पहिला दिवस म्हणजे नवीन झोपडपट्टीचा शेवटचा दिवस असेल अशी घोषणाही त्यांनी केली. जनतेने सर्व पक्षांना दूर साधून मनसेला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
अतुल भातखळकर, सदाशिव लोखंडेंना मनसेत यायचे होते
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते अतुल भातखळखर आणि सदाशिव लोखंडे यांना मनसेमध्ये यायचे होते. मात्र मी त्यांची समजूत काढून त्यांना भाजपमध्येच राहण्याची विनंती केली. गडकरींशी संपर्क साधून त्यांनाही हा प्रकार सांगितला असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. मात्र माझ्या या भूमिकेेचा भाजपला विसर पडला. आता भाजपला मनसेचा नेता पळवताना लाज वाटली नाही का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजप हा बेभरवशाचाच पक्ष आहे अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.