हल्ले रोखण्यास कट्टरवादाविरोधात मोर्चा

By admin | Published: November 26, 2015 03:42 AM2015-11-26T03:42:54+5:302015-11-26T03:42:54+5:30

दहशतवादी संघटनांच्या नव्या कार्यपद्धतीचा वेध घेण्यापूर्वीही त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर पोलिसांनी एक तात्काळ आॅपरेशन प्रणाली अमलात आणलेली आहे.

Front against fanaticism to stop attacks | हल्ले रोखण्यास कट्टरवादाविरोधात मोर्चा

हल्ले रोखण्यास कट्टरवादाविरोधात मोर्चा

Next

दहशतवादी संघटनांच्या नव्या कार्यपद्धतीचा वेध घेण्यापूर्वीही त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर पोलिसांनी एक तात्काळ आॅपरेशन प्रणाली अमलात आणलेली आहे. त्यानुसार विभागीय पोलीस उपायुक्त हे आपत्कालीन प्रसंगी कमांडरच्या स्वरूपात काम करतील आणि ते प्रथम अ‍ॅक्शन घेतील. आयुक्त दर्जाचे अधिकारी आपत्कालीन परिस्थिती हाताळतील. त्यांना चार सहआयुक्त मदत करतील. यात एटीएसचे प्रमुखही असतील. कमांडोचा एक ग्रुप मदतीसाठी तत्पर असेल. एटीएस प्रमुख संभाव्य धोक्याचे आकलन करतील. तर फोर्स वन आणि एनएसजीचे जवान काउंटर अ‍ॅटॅकसाठी असतील.
यासिन भटकळच्या मॉडेलवर, त्याच्या एकूणच कारवायांवर विशेष अभ्यास केलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पॅरिस हल्ल्यातून पोलीस व नागरिकांसाठी बरेच अनुभव आहेत जे त्यांना उपयोगी पडू शकतील. या हल्ल्यानंतर तेथील टॅक्सीचालकांनी मीटर आॅफ करून नागरिकांना मदत केली. हॉस्पिटल, ब्लड बँक, फायर ब्रिगेड, कंट्रोल रूम यांचा समन्वय कौतुकास्पद होता. पोलीसही प्रशिक्षित होते. पोलीस सहकाऱ्यांमधील सहकार्य, समन्वयही उत्तम आहे. पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यातील एक प्रमुख हल्लेखोर इस्माईल ओमर मोस्तफाई याला कट्टरवादी बनविण्यात आले होते. पण या कट्टरवादापासून त्याला दूर करण्यास कोणतेही प्रयत्न केले गेले नव्हते. म्हणूनच असे हल्ले रोखण्यास तारुण्याच्या उंबरठ्यावरील पिढीला कट्टरवादापासून रोखणे हाच योग्य पर्याय असल्याचे मत बनलेल्या महाराष्ट्र एटीएसतर्फे राज्यात एक अभियान राबविले जाणार आहे. त्याअंतर्गत पोलिसांनी पालकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या मुलांच्या वर्तणुकीत संशयास्पद फरक दिसून आला तर तत्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून तरुणांना कट्टरवादापासून रोखता येईल.
एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली आणि सातारा येथील
मौलानांशी याबाबत चर्चा करत
आहोत. इसिसची विचारप्रणाली कशी चुकीची आहे, ते त्यांनी तरुणांना पटवून द्यावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. कल्याणचे जे चार युवक इसिसमध्ये गेले त्यांच्या नातेवाईक, मित्रांनाही आम्ही आवाहन केले आहे की, असे पाऊल कोणी उचलत असेल तर तत्काळ पोलिसांना अथवा तुमच्या नेत्यांना याबाबत माहिती द्या.
पोलिसांच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आले आहे. नया नगर, मीरा रोड येथील चार युवक आणि झुबेर अन्सारी या नवी मुंबईच्या तरुणांना इसिसमध्ये जाण्यापासून रोखले गेले. आम्ही ६६६.्र२ंि१ं३.्रल्ल सारख्या काही वेबसाइटही ब्लॉक केल्या आहेत, ज्या इसिसचा प्रचार करत होत्या.
हल्ल्याची मोडस आॅपरेंडी नवीन
विदेशातून आताच भारतात परतलेल्या रॉच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पॅरिस हल्ल्याचा कट हा सीरियात रचला गेला. हल्लेखोर अल्जेरिया, बेल्जियम, सीरियातील होते.
मुंबईतील सुरक्षेच्या बाबतीत सात वर्षांत बदल झाले, पण यावरही एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, पण ते सर्व कार्यरत आहेत? लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हे कॅमेरे टिपू शकतात का? समुद्र तटावरील पोलिसांसमोर तर मोठे आव्हान असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अजूनही हलगर्जी
मुंबईतील अनेक रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेच्या बाबतीत कमालीचा हलगर्जीपणा दिसत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या पोलीस पथकाने मॉक ड्रिल करत काही रेस्टॉरंटमध्ये बॅग ठेवल्या, मात्र या बॅग कित्येक तास तिथे पडून होत्या. त्याकडे रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी पाहिलेही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

>> चौघा जाँबाजांचा सन्मान कधी?
मुंबईवर झालेल्या ‘२६/११’च्या संहारक हल्ल्याच्या कटुस्मृतीला उजाळा देत राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने त्यातील चौघा जॉँबाज अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतचे केलेले अजब मूल्यांकन चर्चेचा विषय बनलेला आहे. अतिरेक्यांशी लढताना जबर जायबंदी झाल्याने दीर्घकाळ औषधोपचार घेणारे हे चौघे अद्याप राष्ट्रपती शौर्यपदकापासून वंचित आहेत.
पोलीस निरीक्षक विजय पोवार, विजय शिंदे, हवालदार मोहन शिंदे व कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांच्यावरील अन्यायाची ही कहाणी आहे. कामा हॉस्पिटलमधील शेकडो महिला व बालकांच्या संरक्षणासाठी जीव धोक्यात घालून त्यांनी जवळपास २५ मिनिटे अतिरेक्यांशी झुंज तर दिलीच, त्यानंतर जवळपास ६ महिने रुग्णालयात मृत्यूशी यशस्वी झुंज दिली.
मात्र, गेल्या सात वर्षांत त्यांच्या कर्तबगारीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यांच्या पथकातील शहीद झालेल्या उपनिरीक्षक प्रकाश मोरे व कॉन्स्टेबल विजय खांडेकर यांच्यासह टीमचे प्रमुख सदानंद दाते यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित केले आहे. मात्र या चौघांचे प्रस्ताव सादर करण्यास विलंब झाल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.
विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची ओळख प्रामाणिक व सर्वांना न्याय देणारे अधिकारी म्हणून आहे. त्यामुळे त्यांनी यासंबंधी पुढाकार घेऊन शासनाशी पत्रव्यवहार करावा, अशी अपेक्षा चौघा पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
वाहनचालकाच्या शौर्याकडे कानाडोळा
- या चौघांप्रमाणेच स्वत:च्या जिवावर उदार होऊन ताज हॉटेल व परिसरातील शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पोलीस हवालदार लतिफ तडवी याच्या कर्तबगारीकडे दुर्लक्ष केले आहे. घटनास्थळी एनएसजी कमांडो येईपर्यंत ‘ताज’मधील घडामोडी आणि परिसरात लपविलेल्या आरडीएक्सच्या जिवंत साठ्याची माहिती आपली जबाबदारी नसतानाही मोठ्या तत्परतेने ‘कंट्रोल रूम’ला कळविल्यामुळे शेकडो जणांचे प्राण वाचले.




- मात्र अद्यापपर्यंत त्यांना शौर्यपदक तर दूरच कौतुकाचे साधे पत्रही न देण्याचा कोडगेपणा गृह व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविला आहे.

Web Title: Front against fanaticism to stop attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.