मुंबईतील नद्यांच्या उज्ज्वल भविष्याचे ‘स्वप्न’

By Admin | Published: April 30, 2017 02:55 AM2017-04-30T02:55:50+5:302017-04-30T02:55:50+5:30

रिव्हर मार्च’ची सुरुवात तशी रंजकच! चार मित्रांनी मिळून सुरू केलेल्या या उपक्रमाने सध्या चांगलाच लौकिक मिळवला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉक

'Dream' of the bright future of Mumbai rivers | मुंबईतील नद्यांच्या उज्ज्वल भविष्याचे ‘स्वप्न’

मुंबईतील नद्यांच्या उज्ज्वल भविष्याचे ‘स्वप्न’

googlenewsNext

- सागर नेवरेकर

रिव्हर मार्च’ची सुरुवात तशी रंजकच! चार मित्रांनी मिळून सुरू केलेल्या या उपक्रमाने सध्या चांगलाच लौकिक मिळवला आहे. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करताना, चार मित्रांनी हरिणीच्या पिल्लाला मृतावस्थेत पाहिले. या पिल्लाचे शवविच्छेदन केले, तेव्हा त्याच्या पोटातून तीन ते साडेतीन किलो प्लॅस्टिक कचरा बाहेर आला. जंगलातील हरिणीच्या पिल्लाच्या पोटातून प्लॅस्टिक कचरा निघणे हा या चौघा मित्रांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. मग या चारही दोस्तांनी नॅशनल पार्कमधील कचरा वेचण्याचे काम सुरू केले. एक वर्षभर फक्त रविवारी फिरून कचरा जमा करायचे त्यांनी ठरवले. हे करता-करता वर्षभरात सुमारे ८० हजार किलो प्लॅस्टिक कचरा या चौघांनी मिळून जमा केला. तेथून पुढे सुरुवात झाली, ती नॅशनल पार्कला प्लॅस्टिकमुक्त करण्याची! हा संकल्प करणाऱ्या तरुणांची नावे आहेत गोपाल झवेरी, कमल कोठारी, अनिल पंड्या आणि बजरंग अग्रवाल.
मुंबईमध्ये चार नद्या असल्याचे या चौघांना कळल्यावर तर ते झपाटून कामालाच लागले. दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि मिठी नदी या चारही नद्यांचे उगमस्थान संजय गांधी नॅशनल पार्कातून आहे. या चारही नद्या मुंबई शहरातून वाहत जाऊन समुद्राला मिळतात. चारही नद्यांचे पाणी हे केवळ मुंबईकरांसाठी आहे. जेव्हा या नद्या उगमापासून बाहेर पडतात तेव्हा त्या स्वच्छ असतात. पण शहरात पोहोचेपर्यंत त्या मृत बनतात. नद्या मृत होणे म्हणजे पाण्यातील आॅक्सिजनची मात्रा नष्ट होणे. दूषित पाणी, सांडपाणी आणि रासायनिक पदार्थ नद्यांमध्ये मिसळतात तेव्हा नदी खऱ्या अर्थाने मृत बनते. ३० वर्षांपूर्वीची माहिती काढण्याचा प्रयत्न या चौघांनी केला. तेव्हा या नद्यांचे पाणी लोक पिण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी वापरत असल्याचे त्यांना समजले. मुंबईचे शहरीकरण, बकालीकरण आणि काँक्रिटायझेशन झाल्याने या नद्यांचे प्रवाह चिंचोळे बनत गेले.
सद्य:स्थितीला मुंबईतील ८० टक्के लोकांना मुंबईमध्ये ४ नद्या असल्याचे माहीत झाले आहे. २०१५मध्ये दहिसर नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले. या नदीत लोक कपडे धुवत असत. त्यांना समजावून सांगितल्यानंतर हे प्रमाण आता काही प्रमाणात कमी झाले आहे. मोठमोठी हॉटेल्स आणि हॉस्पिटलचे कपडे दहिसर नदीवरच धुतले जात होते. नदीची केवळ साफसफाई करून काही होत नाही, तर तिला पुन्हा जिवंत करणे गरजेचे आहे. मुंबईतील चारही नद्या स्वच्छ झाल्यास लांबून पाणी आणायची गरज भासणार नाही. वैतरणाच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी झाले तर तेथील शेतकऱ्यांना अधिकचे पाणी मिळू शकेल.
पोईसर नदीचीही सध्या अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. कांदिवली येथील क्रांतीनगर आणि मालाडमधील आप्पापाडा भागात या नदीचे उगमस्थान आहे. उगमस्थानापासून १४२ टन प्लॅस्टिक कचरा काढण्यात आला. या नदीच्या उगमस्थानाजवळ मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीवासी राहतात. त्यांच्या मलजलाचा प्रश्न अजून सुटलेला नाही, त्यामुळे येथील रहिवासी पोईसर नदीचा वापर करतात.
ओशिवरा नदीच्या परिसरातही रिव्हर मार्चने जनजागृती सुरू केली आहे. दर रविवारी सदस्यांबरोबर बैठक घेतली जाते. मिठी नदी पात्रात अजून प्रत्यक्ष रिव्हर मार्चचे काम सुरू झालेले नाही. मिठी नदीच्या पात्रात उतरणे सद्य:स्थितीत अशक्य आहे. मिठी नदीवर सर्वच राजकारण्यांचा डोळा आहे. मिठी नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जाते, आता या दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने योजना आखल्या आहेत.
मुंबईतील चारही नद्या मृत होण्याची मुख्य तीन कारणे आहेत. काँक्रिटायझेशन, प्लॅस्टिक कचरा आणि झोपडपट्टीतील मलजल या तीन मुख्य समस्यांकडे सरकारने लक्ष दिले तरच नद्यांचे प्रश्न लवकर सुटतील. समाज आणि सरकार एकत्र आल्यास मुंबईतील नद्यांची स्थिती सुधारू शकणार आहे.
आतापर्यंत रिव्हर मार्चला जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, एमएमआरडीएचे अधिकारी, एमएलए, खासदार
आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टिष्ट्वटरच्या माध्यमातून आणि सचिन तेंडुलकर यांनी ई-मेल पाठवून या अभियानाला पाठिंबा दर्शवला आहे. सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांनी रिव्हर मार्चला शुभेच्छा देऊन भविष्यात एकत्र काम करू, चर्चा करू असे कळविले आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत मुंबईतील नद्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता. एकूणच रिव्हर मार्चच्या आंदोलनातून मुंबईतील नद्या काही प्रमाणात का होईना, स्वच्छ होतील अशी आशा निर्माण झाली आहे.

नॅशनल पार्कमध्ये जिवंत असलेले या नद्यांचे प्रवाह बाहेरही जिवंत राहावेत, यासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक मुंबईकरांच्या मनात या नद्या तुमच्यादेखील असल्याची ही जाणीव करून देण्याचा ध्यास या तरुणांनी घेतला आहे. जेव्हा लोकांच्या मनात ही भावना निर्माण होईल, तेव्हाच नद्यांमधील प्रदूषण थांबण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात होईल, असेही ते बोलून दाखवितात. लोकांच्या मनात नद्यांविषयी प्रेम, आपुलकी निर्माण करण्यासाठी रिव्हर मार्चचा जन्म झाला. ‘रिव्हर मार्च’चा अर्थ म्हणजे नदी आणि मार्च. म्हणजे मार्च महिन्यातील रविवार चळवळीसाठी निवडले गेले. २०१७च्या रिव्हर उत्सवमध्ये तब्बल १७०० लोक जोडले गेले. राजकीय नेत्यांपासून ते शाळकरी मुलांपासून सगळे जण मोठ्या उत्साहात जमले. तेव्हापासून लोकांच्या मनात काही अंशी का होईना, जागरूकता निर्माण होण्यास सुरुवात झाली.

Web Title: 'Dream' of the bright future of Mumbai rivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.