बेवारस मृतदेहांची स्मशानभूमी
By admin | Published: August 30, 2015 02:12 AM2015-08-30T02:12:33+5:302015-08-30T02:12:33+5:30
शीना बोरा हत्याकांडाआधी पेण तालुक्यातील गागोदे गावात तब्बल ६ बेवारस मृतदेह आढळले होते़ धक्कादायक म्हणजे त्यापैकी एकाही प्रकरणात मृतदेह कोणाचा, मृत्यू कसा झाला, हत्या
- जयंत धुळप, अलिबाग
शीना बोरा हत्याकांडाआधी पेण तालुक्यातील गागोदे गावात तब्बल ६ बेवारस मृतदेह आढळले होते़ धक्कादायक म्हणजे त्यापैकी एकाही प्रकरणात मृतदेह कोणाचा, मृत्यू कसा झाला, हत्या होती का याचा तपासच झालेला नाही. तपास न करताच पोलिसांनी या मृतदेहांची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गागोदे गाव हे विनोबा भावे यांचे जन्मगाव आहे़ अहिंसावादी भावेंच्या गावात अशी हिंसक, गूढ व रहस्यमय कृत्ये घडत असल्याने स्थानिक अस्वस्थ झाले आहेत़ शीनाप्रमाणे पोलिसांनी याआधी सापडलेल्या बेवारस मृतदेहांची उकल करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील आणि गोगोद्यातील ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. ते म्हणाले, गागोदे परिसरातच चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध खलनायक रणजीत यांच्या मालकीचे मोठे फार्म हाऊस होते. अलिकडेच ते त्यांनी विकले आहे. हे फार्महाऊस त्यांचे असताना आणि तेथे ते वास्तव्यास असताना या फार्म हाऊसमध्ये नेमके काय चालते, तेथे कोण येते, कोण जाते याचा काहीच पत्ता लागत नसे.
एकाच दिवशी सापडले होते तीन मृतदेह
१९८६ या एका वर्षात येथे तीन मृतदेह सापडले़ पोलिसांनी या तिन्ही मृतदेहांची नोंद बेवारस म्हणूनच केली़ या तथाकथीत बेवारस मृतांचा अंत्यविधी गागोद्याच्या स्मशानभूमीत झाला. या तिन्ही मृतदेहांचा खून झाला आहे किंवा नेमके काय झाले आहे, याची चौकशी पोलिसांनी केली नाही़ केवळ चौकशी केल्यावर फाईल बंद केल्याचे त्यावेळी पोलिसांनी सांगितले़
१९९२ २४ फेब्रुवारी १९९२ रोजी एकाच दिवशी तीन मृतदेह याच परिसरात सापडले होते़ ग्रामस्थांनी यांची माहिती दिल्यानंतर पोलीस तेथे आले. या मृतांचे कोणीही नातेवाईक घटनास्थळी किंवा पेण पोलीसांकडे आले नाहीत. परिणामी या देखील मृतांची नोंद बेवारस म्हणून पोलिसांनी केली़ तपासाविना याही मृतदेहांची विल्हेवाट लावली गेली.
२००२ दर्गावाडी या आदिवासी गावाजवळच्या जंगलात नोंव्हेबर महिन्याच्या आसपास एका मुलीला काही लोक जबरदस्तीने गाडीतून घेवून आले होते़ त्या मुलीला जबरदस्तीने गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला होता़ त्यावेळी ग्रामस्थांनी तेथे धाव घेतल्यावर गाडी चालकाने पळ काढला होता़ या घटनेच्या चार दिवसांनंतर एका तरुणीचा मृतदेह याच दर्गावाडीजवळच्या दरीत या ग्रामस्थांना सापडला होता़ त्या मुलीचा मृतदेह कुजला होता. परिणामी पोलीसांनी जागेवरच डॉक्टरांचा अहवाल घेतला़ त्यानंतर ग्रामस्थांना पंच म्हणून घेऊन तो मृतदेह तेथेच पूरुन टाकला़ तसेच पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून नोंद करून तपास थांबवल्याचे वैशीली पाटील यांनी सांगीतले.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांना दिले होते निवेदन
या संशयास्पद मृतदेहांचा तपास करावा यासाठी दिवाण यांनी रायगडच्या तत्कालीन पोलीस अधिक्षकांसोबत तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशींना दिले होते. विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त जोशी गागोद्यात आले तेव्हा हस्तलिखीत अर्ज त्यांना दिल्याची आठवण दिवाण सांगतात.
नियमातील पळवाट
शहरामध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याआधी मृत्यूचा वैद्यकीय दाखला अत्यावश्यक असतो. परंतू ग्रामपंचायत क्षेत्रात स्मशानात अंत्यविधी करताना अशा दाखल्याची गरज भासत नाही. याच पळवाटेचा फायदा घेत अंत्यसंस्कार करण्याचे हे कारस्थान असल्याची दाट शक्यता वैशाली पाटील यांनी व्यक्त केली आहे.