डॉक्टरांच्या संपाचे पडसाद..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2017 09:39 PM2017-03-25T21:39:21+5:302017-03-25T21:39:21+5:30

फेरफटका

Doctor's collapse | डॉक्टरांच्या संपाचे पडसाद..

डॉक्टरांच्या संपाचे पडसाद..

Next

डॉ क्टरांचा संप सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यावरून अनेक मतप्रवाह व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावरूनही याबाबतच्या वेगवेगळ्या पोस्ट ‘फॉरवर्ड’ केल्या जात आहेत. काही ठिकाणी तर डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचे जोरदार समर्थन केले जात आहे. हे करत असताना अगदी साधी डोकेदुखी ते मोठ्या असाध्य रोगावर उपचार करून घेण्यासाठी आपणाला कुठल्या ना कुठल्या डॉक्टराकडे जावे लागते, याचे भान अनेकजणांचे सुटलेले दिसते. डॉक्टरालाही भावभावना आहेत. तोही कुणाचा आई - बाप, मुलगा - मुलगी किंवा इतर नात्याने जोडला जाणारा एक सामाजिक घटक आहे, याचाही विसर त्यांना पडलेला दिसतो. मात्र, ज्यांच्या घरात एकतरी डॉक्टर झालेला आहे, अशा घरातील व्यक्तींनाच डॉक्टरांचे जगणे काय असते, याची जाणीव असते. एखादी शस्त्रक्रिया असेल, गंभीर अपघात असेल अशावेळी तासाचं गणित न मांडणारा डॉक्टर आपल्या समोरचा रूग्ण मरावा, अशी इच्छा बाळगेल का? असा फारसा विचार कुणी करत नाही. ठराविक डॉक्टर वाईट प्रवृत्तीचा अवलंब करतात, म्हणून सगळ्यांनाच कसाई ठरविणारे आपण इतर सर्वच डॉक्टरांना नैतिकतेचे धडे देतो. मग इतर ठिकाणी भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजलेली असते, त्यांच्या उद्दामपणाबद्दल बोलायचे धाडस का करीत नाही? डॉक्टर होताना आयुष्याची अनेक वर्षे मेहनत करावी लागते. सहजासहजी डॉक्टर होता येत नाही. एवढं करूनही शासकीय नोकरी करताना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. नको तेवढ्या राजकीय हस्तक्षेपाने आज डॉक्टरांना सेवा देणे अवघड झाले आहे. मर्जीतील डॉक्टरच केवळ आपली नोकरी सुखनैव करू शकतो. आज रत्नागिरीत डॉक्टर येणे अवघड झाले आहे. रत्नागिरीची डॉक्टरांना मारहाण करण्याबाबतची महती आज सर्वदूर पसरली आहे. त्यांच्या निवासाची सोय नाही. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रे बघा. आज जिल्हा परिषद, पंचायत समितीचा निवडून आलेला सदस्य वर्षभरात महागडी गाडी फिरवू लागतो. अलिशान बंगल्यात राहायला जातो आणि लाखो रूपये खर्च करून अनेक वर्षे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या वसाहती मोडकळीस आलेल्या. वर्षानुवर्षे दुरूस्ती न झालेल्या, मोडक्या वसाहतीत डॉक्टर आपल्या कुटुंबासह राहतो. डॉक्टर राहात नाहीत, म्हणून गदारोळ माजविणाऱ्यांनी एकदा तरी अशाठिकाणी जाऊन बघावे, लक्षात येईल की त्याचे कुटुंब किती भीतीच्या छायेखाली वावरतेय. आज अनेक दवाखान्यांमध्ये महत्त्वाची औषधे नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत. याचा जाब आपण डॉक्टरला विचारतो. यासाठी राजकीय मंडळी निरपराध डॉक्टरवर आसूड ओढण्याऐवजी आरोग्य यंत्रणेला जाब विचारण्यासाठी आक्रमक होताना फारशी दिसत नाहीत. जे डॉक्टर रूग्णांना लुबाडतात, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. पण रूग्णांसाठी येणाऱ्या निधीवर केवळ सह्या करण्यासाठी अनेक आरोग्य केंद्राच्या स्थानिक समित्यांचे पदाधिकारी हजारो रूपयांची मागणी करतात, त्यांच्याविरोधात कुणी आवाज उठवायचा, त्यांना कुठल्या पक्षाच्या नेतेमंडळींकडून कधीच जाब विचारला जात नाही. आपल्याला अनुकूल असलेल्या डॉक्टरला हवे तिथे पाठवायचे आणि नको असलेल्याला उचलायचे, ही रणनीती सध्या या क्षेत्रात वाढली आहे. त्यामुळेच आज डॉक्टरमंडळी असुरक्षित आहेत.
पूर्वीचे रूग्ण डॉक्टरांना देवदूत मानायचे आणि डॉक्टरांनाही त्यांच्या कर्तव्याची जाणीव असायची. आता या क्षेत्रातही अपप्रवृत्ती निर्माण झाली आहे. मात्र, त्याचा कलंक सगळ्याच डॉक्टरांच्या माथी मारला जातो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे म्हणजे आपण आपल्या नेहमीच्या डॉक्टरवरही अविश्वास दाखविण्यासारखे आहे. आजही एखादा मोठा अपघात किंवा साथीच्या आजारांसारखी घटना घडते, तेव्हा डॉक्टर आपल्या जेवणाचा, झोपेचा, त्रासाचा प्रसंंगी आजाराचा विचार न करता अहर्निश सेवा देतो. अशावेळी डॉक्टरचा कुठे सत्कार झाल्याचा ऐकिवात नाही. अर्थात रूग्णसेवा हे डॉक्टरांचे कर्तव्यच आहे. त्यांनी ते करायलाच हवे. डॉक्टर देवदूत का असतो, हे मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेल्या रूग्णालाच कळते. दुर्दैवाने आपण सुक्याबरोबर ओल्यालाही जाळतो.
- शोभना कांबळे

Web Title: Doctor's collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.