मोदींकडून नेहरूंचे अनुकरण

By admin | Published: November 20, 2014 12:12 AM2014-11-20T00:12:39+5:302014-11-20T00:12:39+5:30

त्या मुलाखतीत, आपण ज्यांना आदर्श मानतो त्यात वीर सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांचा समावेश आहे, असे त्यांनी म्हटले होते.

Modi's imitation of Nehru | मोदींकडून नेहरूंचे अनुकरण

मोदींकडून नेहरूंचे अनुकरण

Next

रामचंद्र गुहा
(इतिहासकार व विचारवंत) - 

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी निवडून आल्यावर ‘इंडिया टुडे’ नियतकालिकाने डिसेंबर २००७ मध्ये त्यांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत, आपण ज्यांना आदर्श मानतो त्यात वीर सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांचा समावेश आहे, असे त्यांनी म्हटले होते. मी ती मुलाखत वाचली त्या वेळी मला वाटले होते की, मोदींचे हे चार आदर्श एकत्र आले असते तर एकमेकांच्या विरोधात युक्तिवाद करीत बसले असते. भगतसिंग हे समाजवादी विचारसरणीचे होते. हिंसाचाराच्या विषयावर सावरकर आणि गांधी यांच्यात मतभेद होते. भारत हे हिंदू राष्ट्र असावे असे सावरकरांचे म्हणणे होते, तर भारताने धर्माच्या आधारावर नागरिकांमध्ये भेद करू नये, असे महात्माजींचे म्हणणे होते. मोदींच्या चार आदर्शांपैकी गांधी आणि पटेल यांचे मात्र एकमेकांशी चांगले पटले असते. पटेल यांनी १९१७ साली वकिली सोडून महात्माजींची साथ केली ती १९४८ साली महात्माजींचा मृत्यू होईपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे या चार आदर्शांमध्ये जी वैचारिक भूमिका आहे, त्यांच्याशी मोदी कसे जुळवून घेतील असा प्रश्न मला ही मुलाखत वाचल्यावर पडला. सावरकर आणि भगतसिंग यांचे पटेल आणि गांधी यांच्याशी धोरणात्मक मतैक्य होणे शक्य तरी होते का ?
मोदींच्या आदर्श पुरुषांमध्ये एका व्यक्तीचे नाव नसलेले पाहून मला तेव्हा आश्चर्य वाटले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षे सरसंघचालक असलेले मा. स. गोळवलकर यांच्या नावाचा मोदींनी उल्लेख केला नव्हता. गोळवलकरांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संघाचे महत्त्व वाढवले होते. मोदी हे संघ शाखेतूनच तयार झाले असून, त्यांनी गोळवलकरांचे विचार आत्मसात केले आहेत. असे असताना इंग्रजी नियतकालिकाला त्यांनी गोळवलकर हे आपले आदर्श असल्याचे सांगितले नाही. अलीकडे माझा एक मित्र पंतप्रधानाच्या कार्यालयात गेला होता. तेथे पंतप्रधानाच्या खुर्चीच्या मागे भिंतीवर महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांचे चित्र त्याने बघितले. तेव्हा मोदींनी सुरुवातीला ज्या चार आदर्शांचा उल्लेख केला त्यातील दोघे चित्ररूपाने त्यांच्या दालनात पाहावयाला मिळाले. पण या दालनात सावरकर आणि भगतसिंग तसेच गोळवलकर यांनादेखील स्थान मिळालेले नाही. मोदी हे नेहमी स्वामी विवेकानंदांविषयी बोलत असतात; पण त्यांचेही छायाचित्र त्यांच्या खोलीत आढळले नाही. ज्या आदर्शांचे फोटो वगळले त्यापेक्षाही जवाहरलाल नेहरूंचा फोटो दिसणे हे जरा महत्त्वाचे होते. त्यामुळे २००७ साली ज्या चौघांचा उल्लेख आदर्श म्हणून त्यांनी केला, त्यापेक्षा त्यांच्या कक्षातील तिघांचे फोटो अधिक सुसंगत वाटत होते. गांधी, पटेल आणि नेहरू हे एकाच उद्देशाने काम करीत होते. गांधी हे काँग्रेसचे नेते आणि स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी होते. सरदार पटेल हे काँग्रेसचे संघटक होते, तर पं. नेहरू हे वलय असलेले लोकप्रिय नेते होते. १९३७ आणि १९४६ च्या निवडणुकीत त्यांचा करिश्मा काँग्रेसला उपयोगी पडला होता. स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या पहिल्या सरकारमधील नेहरू हे पंतप्रधान तर पटेल हे उपपंतप्रधान होते.
नेहरू आणि पटेल यांच्या वृत्तीत असलेल्या फरकाविषयी अलीकडच्या काळात बरेच काही बोलले गेले आहे. पण त्या दोघांनी एकत्रितपणे काम केले आणि ते परस्परांना पूरकही ठरले. याउलट सावरकर आणि गांधी किंवा भगतसिंग आणि पटेल हे एका पक्षात आणि एका सरकारमध्ये राहिले असते अशी कल्पनाही करवत नाही. आपल्या निवडणूक प्रचारात नरेंद्र मोदी यांनी भारताला काँग्रेसमुक्त करू , असे म्हटले होते. निवडणुकीनंतर काँग्रेस जवळजवळ संपल्यासारखी झाली- म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची काँग्रेस संपली. काँग्रेस संपवण्यात ज्यांनी कामगिरी बजावली, त्यांनी आपल्या कक्षामध्ये तीन काँग्रेस नेत्यांचे फोटो लावणे हा विरोधाभास म्हणावा लागेल. त्या फोटोंमुळे मोदींच्या भाजपा आणि संघामधील सहकाऱ्यांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होऊ शकेल. पंतप्रधानांच्या कार्यालयाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट दिल्यावर काय घडेल हे जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. कारण संघाने नेहरूंचा नेहमीच अनादर केला आहे. डिसेंबर १९४७ मध्ये पं. नेहरूंनी रा.स्व.संघ ही खासगी सेना असल्याचा उल्लेख केला होता. ही सेना नाझी तत्त्वावर वाटचाल करीत असल्याचेही म्हटले होते. महात्मा गांधींचादेखील संघाला विरोध होता. त्याचप्रमाणे संघसुद्धा गांधींना विरोध करीत होता. दिल्लीत सप्टेंबर ४७ मध्ये संघ स्वयंसेवकांशी बोलताना गांधी म्हणाले होते की, ही संघटना मुस्लिमांविरुद्धच्या हिंसाचाराला जबाबदार आहे असे आपण ऐकले होते. या शिस्तबद्ध संघटनेने आपल्या शक्तीचा वापर भारताच्या हितासाठी करावा.
आकार पटेल या स्तंभलेखकाने अलीकडे आपल्या लेखात लिहिले होते की, मोदी हे जाहीरपणे काहीही बोलू देत, त्यांचे आदर्श हे मा. स. गोळवलकर हेच आहेत. आपली कारकीर्द संपण्याआधी ते गोळवलकरांना ‘भारतरत्न’ने गौरवतील, असेही त्यांनी भाकीत केले आहे. पटेल हे नरेंद्र मोदींना जवळचे आहेत; पण त्यांचे भाकीत कितपत खरे होईल याविषयी मला शंका आहे. कारण गोळवलकर हे कट्टर धर्मवादी होते. त्यांच्या विचारांनी मोदी संघाचे प्रचारक असताना प्रभावित झालेले असतीलही. आणि गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही हा प्रभाव कायम असण्याची शक्यता आहे. पण आता पंतप्रधान झाल्यावर आणि भारताला घडवण्याचीे जबाबदारी पत्करल्यावर मोदी हे आधुनिक विचारसरणीच्या नेत्यांशी स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्या कक्षातील फोटो हे खरोखरी त्यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दर्शवणारे आहेत की केवळ देखावा आहे हे मला ठाऊक नाही; पण त्यांच्या भूतकाळापासून ते दूर जाऊ इच्छित आहेत एवढे मात्र दिसून येते. रा. स्व. संघासाठी जवाहरलाल नेहरूंचा द्वेष हा प्रमुख विषय होता. पंतप्रधान होण्यापूर्वी मोदींनीदेखील नेहरूंविषयी अत्यंत वाईट विचार व्यक्त केले आहेत. पण आता मात्र ते नेहरूंसारखे जाकीट घालताना दिसतात, आपल्या खोलीत नेहरूंचे छायाचित्र झळकवतात आणि नेहरूंप्रमाणे परराष्ट्र धोरणावर थेट नियंत्रण ठेवतात. या सगळ्याच गोष्टी मनोरंजक आहेत.

Web Title: Modi's imitation of Nehru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.