तिसऱ्या महायुद्धाचे ढग? महासत्तेसाठी चाललेला संघर्ष नव्या दहशतवादी आव्हानांना जन्म देईल काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 08:56 AM2024-03-25T08:56:47+5:302024-03-25T08:57:05+5:30

मॉस्कोजवळील ‘क्रॉकस सिटी हॉल’मध्ये हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ (आयएस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

Clouds of World War III? Will the ongoing struggle for superpowers give rise to new terrorist challenges? | तिसऱ्या महायुद्धाचे ढग? महासत्तेसाठी चाललेला संघर्ष नव्या दहशतवादी आव्हानांना जन्म देईल काय?

तिसऱ्या महायुद्धाचे ढग? महासत्तेसाठी चाललेला संघर्ष नव्या दहशतवादी आव्हानांना जन्म देईल काय?

तिसऱ्या महायुद्धाची घोषणा करत पुन्हा सत्तेत आलेल्या पुतीन यांचा रशिया हादरला आहे. रशियाची राजधानी मॉस्को शनिवारी दहशतवादी हल्ल्याने हादरली. मॉस्कोजवळील ‘क्रॉकस सिटी हॉल’मध्ये हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी ‘इस्लामिक स्टेट’ (आयएस) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ‘आयएस’च्या खोरासान गटाकडून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. पुतीन यांची मुस्लीमविरोधी धोरणे आणि सिरियामधील युद्धात बशर-अल-असाद यांना दिलेला पाठिंबा, ही या हल्ल्यामागील कारणे असावीत अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याचवेळी युक्रेनबरोबरील युद्धात गेल्या दोन वर्षांपासून रशिया अडकला आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रशियाने या हल्ल्यामागे युक्रेन असल्याचा आरोप त्यामुळेच केला आहे. हा आरोप युक्रेनने अर्थातच फेटाळला.

अमेरिकेने दहशतवादी हल्ल्याचा इशारा आधीच दिल्याचे म्हटले आहे. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे काहीही असले तरी या हल्ल्यात निरपराध बळी पडले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आताच्या आधुनिक जगात दहशतवाद हा नवा असा धोका आहे, की त्याविरोधात सामूहिक पातळीवर, योग्य समन्वयातून लढणे हेच उत्तर आहे. अमेरिका-रशिया वितुष्टही या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. महासत्तांच्या खेळींमध्ये छोटे देश भरडले जातात, हे शीतयुद्धाच्या काळात दिसून आले आहे. आताही फारशी वेगळी स्थिती नाही. रशियाला जुने वैभव पुन्हा मिळवून देण्याच्या प्रयत्नांत असलेले पुतीन आणि ‘नाटो’चे जाळे रशियाच्या सीमांपर्यंत विस्तारण्यास उत्सुक अमेरिका, यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत ढकलले जाण्याची भीती आहे.

आताच्या काळात नव्या हायब्रिड युद्धाचे आव्हान सर्वांसमोर आहे. परस्पर थेट युद्ध टाळून अपारंपरिक, असमान युद्ध बड्या देशांविरोधात पुकारण्याची ही नीती आहे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा असाच सामना भारत कित्येक दशके करीत आहे. या युद्धाकडे पाहताना महासत्तांमधील संघर्षाचाही विचार करावा लागतो. ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेची उत्पत्ती आणि ऱ्हासाकडे पाहिले, की याची कल्पना येते. शीतयुद्धकाळात अफगाणिस्तानमधील सोव्हिएत फौजांना हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने या फौजांविरोधात लढण्यासाठी तेथील मुजाहिदिनांना प्रशिक्षित केले. मात्र, सोव्हिएत संघाच्या अंतानंतर पुढे अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आली. दहशतवाद फोफावू लागला. त्याची धग भारतामध्ये जम्मू-काश्मीरलाही बसली. मात्र, तेव्हा जगाने आणि विशेषत: अमेरिकेने याकडे फारसे लक्ष दिले नाही. २००१ मध्ये अमेरिकेलाच दहशतवाद्यांनी लक्ष्य केले, तेव्हा खडबडून जाग्या झालेल्या अमेरिकेने अफगाणिस्तानात आपला तंबू ठोकला.

तब्बल वीस वर्षांनी अमेरिका अफगाणिस्तानमधून माघारी गेली. पण, तिथे पुन्हा तालिबानी राजवटच आली. दहशतवादाच्या या समस्येकडे त्यामुळेच सामूहिक सुरक्षेच्या चौकटीत पाहणे गरजेचे असते. सिरियामध्ये दशकापूर्वी बशर -अल -असाद सत्तेविरोधात आंदोलने झाली. तेथील सरकार उलथवण्याचा प्रयत्न झाला. त्यात एका बाजूने अमेरिका, तर दुसऱ्या बाजूने रशिया हे देश होते. इस्लामिक स्टेटचे देखील आव्हान होते. आज या दहशतवादी संघटनेचे अस्तित्व फारसे राहिलेले नाही. मात्र, वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांतून या संघटना अस्तित्व दाखवून देतात. ज्या खोरासान गटाने मॉस्कोमधील हल्ला केल्याचे बोलले जात आहे, त्या गटाने २०२१ मध्ये काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला होता. २०२२ मध्ये काबूलमधीलच रशियाच्या दूतावासावर हल्ला केला. इराणमध्ये २०२४ मध्ये बॉम्बस्फोट झाला, त्यात शंभर जणांचा मृत्यू झाला. रशियाने युक्रेनवर हल्ल्याचा ठपका ठेवून युक्रेनची राजधानी कीव्ह आणि इतर ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. रशियासमोर प्रत्यक्ष युद्धाबरोबरच असमान अशा दहशतवादी युद्धाचेही आव्हान आहे.

दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका भारत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सातत्याने मांडत आहे. मात्र, जागतिक सत्तासंतुलनासाठी असलेली चुरस आणि महासत्तेसाठी चाललेला संघर्ष नव्या दहशतवादी आव्हानांना जन्म देईल काय, अशी भीती आहे. दहशतवाद्यांची आर्थिक आणि शस्त्रांची रसद तोडणे; तसेच दहशतवादाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा अवलंब दहशतवादाला बऱ्यापैकी आळा घालेल. भारताने जी-२० देशांच्या परिषदेत ‘वसुधैव कुटुंबकम’चा नारा दिला होता. जगात अनेक दहशतवादी हल्ल्यांत जे निरपराध मृत्युमुखी पडले, त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी साऱ्या जगाला कदाचित तोच नारा देतील. ‘युद्ध नको, बुद्ध हवा’, याच दिशेने जगाला जावे लागणार आहे!

Web Title: Clouds of World War III? Will the ongoing struggle for superpowers give rise to new terrorist challenges?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.