आज त्रिमूर्ती शाळा पाडणार
By Admin | Published: June 19, 2016 11:34 PM2016-06-19T23:34:15+5:302016-06-20T00:56:22+5:30
औरंगाबाद : जयविश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीचा भूखंड एका खाजगी शैक्षणिक संस्थेला ९९ वर्षांच्या करारावर देण्याचा पराक्रम या भागातील सोसायटीने केला.
औरंगाबाद : जयविश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीचा भूखंड एका खाजगी शैक्षणिक संस्थेला ९९ वर्षांच्या करारावर देण्याचा पराक्रम या भागातील सोसायटीने केला. मागील तीन दशकांपासून मनपाच्या जागेचा अनधिकृत वापर करणाऱ्या संस्थेला प्रशासनाने सील ठोकले. सोमवारी संपूर्ण शाळा पाडण्यात येणार आहे.
जयविश्वभारती गृहनिर्माण संस्थेने सीटीएस क्र. १५६८९ मधील ५२५ चौरस मीटर जागा त्रिमूर्ती बालक मंदिर या शैक्षणिक संस्थेस दिली. १९८४ मध्ये ९९ वर्षांच्या लीजवर जागा देण्यात आली. दुसरीकडे सोसायटीने आपल्या लेआऊटमधील ही जागा महापालिकेला दिली. महापालिकेनेही जागा त्वरित ताब्यात घेण्याचे औदार्य दाखविले नाही. मागील तीन दशकांपासून अनधिकृतपणे शाळा चालविण्यात येत आहे. त्रिमूर्ती बालक मंदिरला औरंगाबाद खंडपीठ, सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने ११ वर्षांपूर्वी जागा मनपाची असल्याचा निर्वाळा दिल्यानंतरही महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संस्थेला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल, यावर भर दिला. जागा ताब्यात न घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शोध प्रशासन घेत आहे. फाईल दाबून ठेवणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाईही करण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जयविश्वभारती कॉलनी येथील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली. त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा आपल्या सोसायटीतून बाहेर करावी ही प्रमुख मागणी रहिवाशांची आहे. न्यायालयाने यासंदर्भात मनपाला उचित निर्देश दिले आहेत. त्यानुसार मनपाने शाळेला सील ठोकले.