फुलेंच्या सत्यशोधक समाजाची केलेली वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2016 01:00 AM2016-09-23T01:00:41+5:302016-09-23T01:00:41+5:30

एका उदात्त हेतूने १८७३ साली बरोबर आजच्याच दिवशी महात्मा जोेतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

Carnation of the true Satyashodhak Samaj of flowers | फुलेंच्या सत्यशोधक समाजाची केलेली वाताहत

फुलेंच्या सत्यशोधक समाजाची केलेली वाताहत

Next

प्रा.डॉ.वामनराव जगताप
(सामाजिक-राजकीय प्रश्नांचे विश्लेषक)
एका उदात्त हेतूने १८७३ साली बरोबर आजच्याच दिवशी महात्मा जोेतिबा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ब्राह्मणी पुरोहितशाहीच्या धार्मिक छळ व गुलामगिरी विरुद्ध मुक्ती लढा पुकारून सामाजिक लोकशाहीची स्थापना करण्यासाठी संघर्षवादी भूमिका घेणारा समाज म्हणून त्याची प्रथम ओळख करून दिली गेली. समाजाची एकात्मता हीच राष्ट्रीय एकात्मता या मजबूत पायावर सत्यशोधक समाजाचे अधिष्ठान होते. भारताच्या सबंध इतिहासात दुर्बल ब्राह्मणेतरांचे स्थान काय, राष्ट्र म्हणजे काय, स्वातंत्र्य कोणासाठी, स्वातंत्र्य कशासाठी, इत्यादी मूलभूत सामाजिक प्रश्न जोेतिबांनी व्यवस्थेला प्रथमच विचारले व त्यातूनच ब्राह्मणेतरांना आत्मभान, आत्मसन्मान, ऊर्जा प्राप्त झाली.
१८७३ ते १८८५ या काळात जोतिबांच्या हयातीतच सत्यशोधक समाजाचा जोरकस प्रचार-प्रसार होऊन त्याचे कार्यक्षेत्र मुंबईसह महाराष्ट्राच्या दुर्गम खेड्यापाड्यातून शेतकरी-शेतमजूर, शहरी कामगारवर्ग यांच्यात प्रभावीपणे पसरले. एवढेच नव्हे तर टिळकांची कट्टर प्रतिगामी स्वरुपाची विचार, कृति चळवळही या उत्कटतेने प्रभावित झाली व त्यांनाही वाटू लागले की, सत्यशोधक समाजाची उपेक्षा करून चालणार नाही. पण जोेतिबांच्या निधनानंतर (१८९०) थोड्या काळातच सत्यशोधक समाजाला अवकळा येऊन त्याची अतोनात वाताहत झाल्याचे चित्र निर्माण झाले.
जोेतिबांंच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या कार्यात सहभागी झालेल्या राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आणि केशवराव विचारे यांचा अपवाद वगळता बाकीच्या ब्राह्मणेतर नेत्या-कार्यकर्त्यांनी भरीव असे काहीच केले नाही. उलट ब्राह्मणी छळ-जाचातून, ब्राह्मणेतर वर्गाला मुक्त करण्याच्या जोेतिबांच्या स्वप्नाला तिलांजली देऊन अखेरपर्यंत केवळ ब्राह्मणद्वेष करण्यातच धन्यता मानली. १९२५ साली जवळकरांनी लिहिलेल्या ‘देशाचे दुष्मन’ या पुस्तकातून याची प्रचिती येते.
१८८५ साली राष्ट्रीय कॉग्रेसचा उदय झाला आणि सत्यशोधक मंडळींना समाजकारणाऐवजी राजकारण आणि सत्ता यांची स्वप्ने पडू लागली. २८ डिसें.१८८५ च्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या प्रथम अधिवेशनाच्या स्वागत समितीत स्वत: केशवराव जेधे हातात डफ घेऊन कॉग्रेसच्या प्रचार-प्रसारात रंगून गेले व त्यावर कडी म्हणजे भास्करराव जाधवांना इंग्रजांनी नामदारकीचे आमीष दाखिवताच ते चक्क इंग्रजधार्जिणे झाल्याचे स्पष्ट झाले. १९३६च्या फैजपूर (खान्देश) येथील काँग्रेसच्या ५० व्या राष्ट्रीय अधिवेशनात सत्यशोधक समाजातील सर्व मंडळीनी जोतिबांच्या कार्याकडे पाठ करून सत्यशोधक समाजाला पूर्णपणे राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये विलीन करून त्याच्या दावणीला बांधून टाकले.
राजर्षी शाहू महाराजांची यामुळे घोर निराशा झाली. तरीही त्यांनी हयातभर सत्यशोधक समाजाला मदतीचा हात दिला. पण सत्यशोधक समाजाची स्थिती दिवसेंदिवस ढासळत गेली. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात अत्यंत निराशात्मक उद्गार काढताना, महाराजांनी म्हटले, ‘सत्यशोधक समाजाला ब्राह्मणशाहीचे वर्चस्व समूळ नष्ट करण्यात यश आले नाही व समाजाच्या जनकाची (जोतिबा फुले) सामाजिक क्रांतीची तीव्रता व कळकळही राहिली नाही’. या निराशेपोटीच अखेर त्यांनी आपल्या सर्व शैक्षणिक संस्था, प्रतिष्ठाने आर्य समाजाच्या अधिपत्याखाली आणली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही अनुभव व विश्लेषण यापेक्षा वेगळे नव्हते. ते म्हणतात, ‘या मंडळीनीं ब्राह्मणेतर म्हणजे फक्त मराठा असा प्रसार-प्रचार सुरु केला आणि महारादि खालच्या वर्गावर ही मंडळी आतंक गाजवू लागली, शैक्षणिक परिषदांमध्येसुद्धा विटाळ होईल म्हणून अस्पृश्यांना दूर बसविण्यात येऊ लागले. त्यामुळे हा वर्ग या चळवळीपासून दूर गेला, या वर्गाची नाळ सत्यशोधक समाजाशी कधीच जुळली नाही आणि सारी चळवळ फसली’.
‘सत्यशोधकांनी ब्राह्मणांचा धिक्कार तर केला नाहीच, उलट गुलामी मनोवृत्तीने त्यांची नक्कल करीत ब्राह्मण्याचा हव्यास बाळगला व अनेकांनी दुय्यम दर्जाचे ब्राह्मण बनण्याचा प्रत्यन केला’, असेही बाबासाहेबांचे साधार मत बनले होते. जोेतिबांबाबत ब्राह्मणेतरांचा दृष्टीकोन कसा होता, याबाबत ते म्हणतात, ‘फुले अस्पृश्य समाजातील होते म्हणून मराठा समाजाच्या दृष्टीने कनिष्ठच होते’. मधल्या काळात मृतप्राय केल्या गेलेल्या जोतिबांना संजीवन दिले ते डॉ. बाबासाहेबांनीच.
त्यानंतरचा आत्तापर्यंतचा काळही आशादायक नाही, पूर्वीचे सत्यशोधक पुढारी समाजाला वाऱ्यावर सोडून कॉग्रेसी झाले. पण स्वत:स सत्यशोधक म्हणविणाऱ्या बहुजन-मराठा पुढाऱ्यांनी एका हातात सत्यशोधक समाज व दुसऱ्या हातात राजकारण अशी दुहेरी नीति अवलंबिली. समाजाच्या अधिवेशनाच्या संयोजन समितीचा एक सदस्य म्हणून दोनेक अधिवेशनांचा (औरंगाबाद १९८८ व बोराडी जि. धुळे १९९१) मी साक्षीदार होतो. त्यातील परिसंवाद, स्मरणिकेतील विषय शेती, माती, पाणी यापलीकडे गेले नाहीत. घाम गाळणारे मजूर-कास्तकार, अल्पभूधारक याबद्दल एका शब्दानेही कुठे उल्लेख सापडत नाही. स्मरणिका व निमंत्रण पत्रिकेतील जोेतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचा आकार अत्यंत लहान आणि संयोजकांच्या प्रतिमांचा मात्र अत्यंत मोठा. जोतिबांचा उल्लेखही एकेरी. परस्परांना जोतिबा फुले, नवा जोतिबा म्हणण्याची जणू स्पर्धाच. बव्हंशी मंडळी मराठा व राजकीय असल्यामुळे वैयक्तिक प्रशंसा व श्रेष्ठींच्या चापलुसीला उधाण येत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नाव वापरून लिहिलेल्या एका लेखात त्यांचा एका शब्दानेही कुठं उल्लेख सापडला नाही. उलट असे म्हटले गेले की, कर्मवीर भाऊराव पाटलांचा अपवाद वगळता फुलेंचा सच्चा अनुयायी म्हणावा असा कोणी झालाच नाही.
या सर्व पार्श्वभूमीवर सत्यशोधक समाजाच्या घटनेतील उद्दिष्ट व ध्येयाच्या अनुषंगाने ही मंडळी प्रयत्नशील असल्याचे कधी जाणवलेच नाही. त्यांच्या घरात जोतिबांची प्रतिमा नाही. जोतिबांबद्दल खुद्द माळी समाजाला विचाराल तर भ्रमनिरास करणारी उत्तरे येतात. समतेला छेद देणाऱ्या प्रतिगामी स्वरूपाच्या अनेक बाबी ही मंडळी पवित्र मंचावरून कधी छुप्या पध्दतीने, तर कधी सरळ-सरळ प्रवाहित करीत आहेत. खरं तर सत्यशोधक समाजाच्या घटनेत या विचार मंचावरून राजकारण करणे निषिद्ध व आक्षेपार्ह असताना ही मंडळी नित्य राजकारण करीत आली पण त्यांनी या राजकारणाला समाजकारणाची जोड दिली नाही. सत्यशोधक समाजाची आजची स्थिती मरणासन्न आहे. तिचे अस्तित्व कुठं जाणवतच नाही. जोतिबांची जयंती, स्मृतीदिवस व वर्धापन दिवसाच्या चार-चौघातील साध्या चर्चेपुरताच तो शिल्लक आहे व ही एक मोठी खंत व शोकांतिका आहे.

Web Title: Carnation of the true Satyashodhak Samaj of flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.