टर्निंग पॉइंट - अपयशातून खचलो पण मिळाली नवी दिशा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 01:58 PM2024-03-18T13:58:15+5:302024-03-18T14:03:08+5:30
अपयशातून यशाची पायरी...
एका लहानशा खेड्यात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. जिल्हापरिषदेच्या शाळेत शिक्षण झाले. शाळाही एक शिक्षिकी. एक वर्ग आणि त्यात अभ्यासासाठी लागलेल्या चार ते पाच रांगा. पुढे शिक्षणाची सोय नाही म्हणून वडील ठाण्याला शिफ्ट झाले. लहानशाच्या घरात मी माझी भावंडे, चुलत भावंडं असे एकत्र राहण्यास होतो. दहावीला चांगले मार्क मिळाल्याने ठाणे उपनगरात पहिला आलो. त्यानंतर मुलुंडच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. बारावीच्या परीक्षेनंतर आजारी पडलो. ८६ टक्के मार्क मिळाले. मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पुढील शिक्षणासाठी बेळगावमधील कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पहिल्यांदाज एकटा लांब जात असल्याने आई रडत होती. निघताना, "आमच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस" हे तिचे शब्द कायम गाठीशी आहे. कळत्या वयात विश्वास टिकवून ठेवण्याचे ते चॅलेंज मी स्वीकारले.
कर्नाटकात असल्याने सापत्नपणाची भावना होती. प्रॅक्टिकलदरम्यान एका विद्यार्थ्याने मला हटकले. तू हे करू शकत नाही म्हणाला. मला वाईट वाटले. मी त्यालाच चॅलेंज देत, तुझ्यापेक्षा एक मार्क जास्त घेईल सांगितले. त्यावर्षी युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आलो. पुढे, जिल्हा परिषदेच्या रुग्णालयात ज्युनियर डॉकटर म्हणून रुजू झालो. तेथे दिवसभर श्रमदान करून परतलो तेव्हा एका वरिष्ठ डॉक्टरने विनाकारण अपमान केला. कामाचे कौतुक करण्याऐवजी ज्युनियर असून सिनियर बनू म्हणून सर्वासमोर ओरडले. तेथून निघालो. थेट बस थांबा गाठला. बस थांब्यावरच रात्र काढली. झालेल्या अपमानाने पुन्हा एकदा स्वतःला आणखीन काही तरी मोठं करण्याचे चॅलेंज दिले.
तेथून ठाण्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून काम सुरु केले. तेथेही किती दिवस काम करणार?, पुढे काय म्हणून यूपीएससीची परीक्षा देण्याचे ठरवले. आरोग्य केंद्रासमोरच असलेल्या यूपीएससीचे प्रशिक्षण देणाऱ्या केंद्रात फॉर्म भरला. परीक्षा देवून घरी आलो. वडिलांशी याबाबत चर्चा सुरु असतानाच, अचानक फोन खणखणला. ५ सप्टेंबर. रविवारचा दिवस होता.कॉल करणाऱ्याने संख्या चुलत भावाचा अपघात झाल्याचे सांगितले. तात्काळ रुग्णालय गाठले. तेथून त्याला सायन रुग्णालयात नेण्यास सांगितले. जखमी भावाला घेऊन रुग्णवाहिकेतून सायनच्या दिशेने निघालो. त्याने हात घट्ट पकडला होता. रवी मला वाचव म्हणत होता. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वी त्याने प्राण सोडले. तो आयुष्यातील खुप मोठा धक्का होता. त्याची स्मृती म्हणून त्याचे डोळे दान करण्याचे ठरवले मात्र तेथील पोलिसांनी अपघात असल्याने नकार दिला.
तेथून पुन्हा भावाच्या विश्वासाला पात्र ठरायचे ठरवले. यूपीएससीची तीन ते चार महिन्यात प्रीलियममध्ये पात्र झालो. मेन्स मध्येही पात्र झालो. रिझल्ट आला. सकाळपासून काही खाले नव्हते. उशिराने समजले रिझल्ट निगेटिव्ह आला. निकालानेच मी कोसळलो. दोन तासाने भानावर आलो तेव्हा रुग्णालयात होतो. कुटुंबीयांची माफी मागितली. तेव्हा वडिलांनी धीर देत प्रयत्न सोडू नको सांगितले.
नेहमीच येणाऱ्या यशानंतर मिळालेल्या अपयशाने खचलो होतो. त्यातूनही कुठेतरी खालच्या पदाची नोकरी लागली असती. मात्र त्या अपयशाने जिद्दीला बळ दिले. पुन्हा नव्या जोमाने रिस्टार्ट केले. भावनिकतेचे बुडबुडे संवेदशीलतेच्या झऱ्यात बदलायचे. ह्रदयाचे तार छेडते ती संवेदना. दोनच दिवसांनी प्रीलियम देत पास झालो. मुलाखतही चांगली झाली. पुढच्या वर्षीच संपूर्ण भारतात ५३ आणि महाराष्ट्रात दुसरा म्हणून निवड होत आयपीएस झालो.
गडचिरोली, गोंदिया, सांगली, सिंधुदुर्ग, बुलढाणा मध्ये एसपी म्हणून कामगिरी बजावली. तेथून मुंबईच्या अतिमहत्त्वाच्या अशा परिमंडळ एकमध्ये पावणे चार वर्ष पोलीस उपायुक्त, विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त, तेथून पुण्यात सह आयुक्त सध्या लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे.
आयुष्य हा एक गेम आहे. येणारी परिस्तिथी म्हणजे त्यातील एक लेव्हल. आयुष्य नावाचा गेम प्रत्येकानेच खेळला पाहिजे. प्रत्येक चॅलेंज, त्याचा प्रवास आनंदाने जगायला हवा. प्रत्येक लेव्हल पार करत एक चांगले आयुष्य जगायला हवे. आयुष्य चालतेय म्हणण्यापेक्षा ते कसे धावेल त्यादिशेने प्रयत्न करायला हवे. अपयशही यशाची पायरी आहे, देखील लक्षात ठेवायला हवे.- डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस-