राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चेंबूरमध्ये ‘भीख मांगो’
By Admin | Published: September 2, 2015 02:58 AM2015-09-02T02:58:47+5:302015-09-02T02:58:47+5:30
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी करूनदेखील समाजकल्याण
मुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी करूनदेखील समाजकल्याण विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळावा, यासाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून चेंबूरमध्ये भीख मांगो आंदोलन करण्यात आले.
राज्यातील प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याला सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र ही शिष्यवृत्ती शैक्षणिक वर्षात मिळत नाही. शिवाय याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांना वाईट वागणूक दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून येथील अधिकाऱ्यांची ही मुजोरी वाढत आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून चेंबूरमध्ये ‘भीख मांगो आंदोलन’ करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना त्याच वर्षात त्यांची शिष्यवृत्ती मिळावी, आॅनलाइन पद्धतीने फॉर्म भरून तत्काळ रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच ज्या अधिकाऱ्यांकडून शिष्यवृत्ती वितरणासाठी दिरंगाई केली जाते, अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तत्काळ अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, अशा अनेक मागण्या या वेळी या विद्यार्थ्यांनी केल्या.